Mumbai Rain update : मुंबईत रविवारपासून तसेच मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राती १ ते ७ या काळात तब्बल ३०० मीमी पावसाची नोंद मुंबईत झाली आहे. या पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. लोकल आणि अनेक रेल्वेगाड्या या जागेवरच उभ्या असून याचा फटका प्रवाशांना बसला आहे. या सोबतच अधिवेशनासाठी जाणाऱ्या मंत्री आणि आमदार यांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची रेल्वेगाडी ही ट्रॅकवरच उभी राहिल्याने त्यांनी गाडी सुटण्याची वाट न पाहता थेट रेल्वेट्रॅक वरून पायी चालणे पसंत केले. आज सकाळी ९.४५ च्या दरम्यान हे दोघेही रेल्वे ट्रॅकवरून हातात सामान घेऊन पुढे उभ्या असणाऱ्या दुसऱ्या रेल्वेगाडीत बसून त्यांनी मंत्रालय गाठले.
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासूनच मुंबईची रेल्वे सेवा कोलमली. मध्य रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे सकाळपासून अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. तर बाहेरुन येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या या मध्येच उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. सायन स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पावसाचे पाणी साठल्याने पडल्याने राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे ज्या रेल्वेने मुंबईत येत होते, ती गाडी मध्येच उभी करण्यात आल्याने दोघांना ही रेल्वे ट्रॅकवरुन चालून दुसरी गाडी पकडण्याची वेळ आली. त्यांचा हा ट्रॅकवरून चालणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मिटकरी यांना झालेल्या त्रासाबद्दल माहिती देतांना दिसत आहेत. त्यांच्या सोबत आणखी काही आमदारांना देखील या पावसाचा फटका बसला आहे.
या व्हिडिओत बोलतांना अमोल मिटकरी म्हणाले, दोनचार आमदार व मंत्री अनिल पाटील आम्ही या पावसात अडकून पडलो आहे आमची एक्सप्रेस गाडी ही एकाच ठिकाणी उभे असून अधिवेशनाठी मंत्रालयात जायचे असल्याने आम्ही चालत निघालो आहोत. आम्ही दादर व कुर्ला स्टेशनच्या मध्ये अडकून पडलो आहोत. पावसामुळे सगळं जनजीवन विस्कळीत झालं असून विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा असल्याने आम्ही मंत्रालयात जात आहोत. मात्र, पावसामुळे प्रवासात आमचे मोठे हाल झाले आहेत. पावसाची तीव्रता कमी होऊन लवकरच रेल्वे वाहतूक पूर्ववत होईल अशी आशा असल्याचे मिटकरी म्हणाले.
अमोल मिटकरी आणि अनिल पाटील यांनी रेल्वे ट्रॅक वरून चालत जाऊन कुर्ला ईस्ट नेहरूनगर पोलीस चौकीत येऊन थांबले. मात्र, रस्त्यावर देखील ट्रॅफिक जॅम असल्याने त्यांना मंत्रालयात पोहोचण्यात यअनेक अडचणी येत आहेत. अधिवेशनासाठी महालक्ष्मी एक्स्प्रेसने काही आमदार मुंबईत येण्यासाठी निघाले होते. मात्र, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने महालक्ष्मी एक्सप्रेस ही अंबरनाथ स्थानकाजवळ थांबवण्यात आली आहे. यामुळे या गाडीत अनेक आमदार हे अडकून पडले आहेत.
संबंधित बातम्या