Pollution in Mumbai: देवनार, गोवंडी भागात अनधिकृत RMC प्लांटमुळे प्रचंड प्रदूषण; महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pollution in Mumbai: देवनार, गोवंडी भागात अनधिकृत RMC प्लांटमुळे प्रचंड प्रदूषण; महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

Pollution in Mumbai: देवनार, गोवंडी भागात अनधिकृत RMC प्लांटमुळे प्रचंड प्रदूषण; महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

Updated Feb 23, 2025 01:46 PM IST

Pollution in Mumbai: मुंबईतील देवनार, गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द या परिसरात अनधिकृत आरएमसी प्लांट (Ready Mix Concrete Plant) मुळे प्रदूषणाची प्रचंड मोठी समस्या निर्माण झाली आहे. हे प्लांट बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.

देवनार, गोवंडी भागात अनधिकृत RMC प्लांटमुळे होतेय प्रचंड प्रदूषण
देवनार, गोवंडी भागात अनधिकृत RMC प्लांटमुळे होतेय प्रचंड प्रदूषण

मुंबईतील अनेक भागातील हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. प्रदूषणाच्या समस्येवर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. मुंबईतील देवनार, गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द या परिसरात प्रदूषणाची समस्या फार मोठी आहे. शहरात देवनारमध्ये सर्वाधिक प्रदूषणाची नोंद झाली असून शुष्क वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या भागात असलेले डम्पिंग तसेच अनधिकृत चालणारे आरएमसी प्लांट (Ready Mix Concrete Plant) याला जबाबदार असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत ईशान्य मुंबईचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना नुकतेच पत्र पाठवून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक या अनधिकृत आरएमसी प्लांटवर कार्यवाही करीत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार आरएमसी प्लांट लोकवस्तीपासून दूर असायला हवे. मात्र देवनार, शिवाजी नगर, गोवंडी तसेच मानखुर्द या लोकवस्तीच्या भागात हे प्रदूषण वाढवणारे प्लांट कार्यरत आहेत. या भागात इंडिया क्रियेट आरएमसी गोवंडी, डायनामाईक आरएमसी देवनार, आरडीसी कॉंक्रीट आरएमसी व श्री सिमेंट आरएमसी गोवंडी हे सर्व आरएमसी प्लांट अनधिकृतपणे चालू असून कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. सिमेंट, धुळीमुळे स्थानिक रहिवाशांना श्वसनाचे त्रास होत आहे. शिवाय पावसाळ्यात नाल्यामध्ये गाळ जमा झाल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

आरएमसी प्लांटविरोधात स्थानिक नागरिकांची खासदारांकडे धाव

स्थानिक नागरिकांनी याबाबत खासदार संजय दिना पाटील यांच्याकडे आरएमसी प्लांटबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या तक्रारीच्या आधारावर खासदार संजय दिना पाटील यांनी १९ जून २०२४ रोजी एम पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करुन हे सर्व प्लांट बंद करण्याबाबत विनंती केली होती. तरीही हा प्लांट अद्याप बंद करण्यात आलेला नाही. त्यानंतर १४ जानेवारी २०२५ रोजी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना या प्लांटबाबत लेखी तक्रार देऊन हे आरएमसी प्लांट बंद करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र एक महिना ओलांडल्यानंतर ही यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. पालिकेच्या बेजबाबदार आणि हलगर्जीपणामुळे या भागात प्रदूषणात वाढ झाली असून पालिका अधिकारी हे नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे खासदार संजय दिना पाटील यांनी सांगितले.

Haaris Rahim Shaikh

TwittereMail

हारीस शेख हे हिंदुस्तान टाइम्स -मराठीचे संपादक आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स (ऑनलाइन)चे संपादक म्हणून काम केले आहे. तत्पूर्वी मटा (ऑनलाइन)चे दिल्ली प्रतिनिधी, ईटीव्ही -मुंबई ब्युरोमध्ये प्रतिनिधी म्हणून काम केले. टिव्ही, प्रिंट आणि डिजिटल न्यूज माध्यम क्षेत्रात २३ वर्ष काम करण्याचा अनुभव. राजकारण, अर्थजगत, आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर नियमित लिखाण.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर