Parbhani Violence: परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्यानंतर बुधवारी परभणी शहर आणि जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेर्धात नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केली. आता या घटनेवर आरपीआय पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी आपली प्रतिक्रिया दिली. संविधानचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही. संविधानाचा अवमान करण्याऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे का? याचाही तपास करायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे.
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामार्गाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली. मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने संविधानाची प्रत ठेवलेल्या काचा फोडल्याचा प्रकार घडला.
‘परभणीत मंगळवारी एका व्यक्तीने बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत ठेवलेल्या काचा फोडल्या, हा राज्यघटनेचा आणि बाबासाहेबांचा अपमान आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर कोणी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे का? याची चौकशी व्हायला हवी, असे रामदास आठवले म्हणाले. ज्या आंबेडकरी बांधवांनी आंदोलन केले आहे, त्यांनी आंदोलन शांततेत ठेवावे’, असे रामदास आठवले यांनी अवाहन केले आहे.
परभणीतील हिंसाचारावरून शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजप प्रणित महायुती सरकारवर निशाणा साधला असून सत्तेत राहणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे म्हटले आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेला पूर्णवेळ गृहमंत्री राज्यात नाही, असे त्या म्हणाल्या. ही अत्यंत लाजिरवाणी घटना असून जो हिंसाचार होत आहे, तो दुर्दैवी आहे. हा हिंसाचार या सरकारच्या अपयशाचे द्योतक आहे. यावरून सरकारची प्राथमिकता दिसून येते, ती म्हणजे त्यांची सत्ता वाचवणे आणि राज्यातील जनतेसाठी काम करणे नाही, असे त्या म्हणाल्या.
परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ खंडू गावडे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पोलिस प्रशासन रस्त्यावर उतरले आहे. आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात आहे; आम्ही अतिरिक्त पोलिसांना पाचारण केले आहे. त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतो.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही महायुती सरकारवर टीका केली आहे. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून येथे अशा घटना सर्रास घडत आहेत. लोकांनी शांतता राखली पाहिजे. बाबासाहेब आणि त्यांच्या विचारांच्या पाठीशी आम्ही महाराष्ट्रातील जनता नेहमीच आहोत, हे सर्वांना ठाऊक आहे.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनीही या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. मरकटवाडी व इतर ठिकाणी ज्या प्रकारे हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न झाला आहे, त्यावरून राज्याला हिंसेच्या गर्तेत ढकलण्याचे हे षडयंत्र असू शकते, असे आम्हाला वाटते.
संबंधित बातम्या