Ramdas Athawale : राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी एक अन् मंत्रिमंडळ विस्तारात जागा द्या - रामदास आठवले
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांची भेट घेऊन आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली.
मागील जवळपास अडीच वर्षापासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांची महाविकास आघाडी सरकारची यादी शिंदे-भाजप सरकारने रद्द केली आहे. त्यामुळे आता भाजप सहयोगी पक्षांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार पद मिळवण्यासाठी अपेक्षांचे धुमारे फुटू लागले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भाजपसोबत निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी ‘आरपीआय’ ला सत्तेत चांगला वाटा मिळाला पाहिजे, अशी मागणी आठवलेंनी फडणवीसांकडे केली आहे.
फडणवीसांची भेट घेतल्यानंतर रामदास आठवले म्हणाले की, ‘आरपीआय’ हा पक्ष २०१२ पासून भाजपासोबत आहे,त्यामुळे तुमच्याकडे दुर्लक्ष होणार नाही. आरपीआयला नक्कीच सत्तेचा वाटा मिळेल, असे आश्वासन फडणवीसांनी घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी दिली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही कसल्याही परिस्थितीत जिंकणार आहोत. आरपीआयची सर्व ताकद भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत असेल, अशी प्रतिक्रिया आठवलेंनी दिली आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास आरपीआयला जागा मिळणार आहे का? याबाबत विचारलं असता रामदास आठवले म्हणाले, “याबाबत आता कसलीही चर्चा झाली नाही. परंतु यापूर्वी मी दोन वेळा मंत्रिपदासाठी फडणवीसांशी चर्चा केली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी आरपीआयचा नक्की विचार केला जाईल, असं फडणवीसांनी मला सांगितलं आहे. तसेच राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी एक जागा आम्हाला देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
संबंधित बातम्या