Pankaja Munde may get Rajya Sabha Ticket : देशातील १५ राज्यांतून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक जाहीर होताच महाराष्ट्रात अनेक नावांची चर्चा झाली आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव यात आघाडीवर आहे. भाजपकडून यावेळी त्यांना उमेदवारी निश्चित मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
पंकजा मुंडे या भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. मराठवाड्यात त्यांना बऱ्यापैकी जनाधार आहे. राज्यात फडणवीस सरकारच्या काळात त्या मंत्री होत्या. मात्र, २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पक्षांतर्गत कुरघोडीतून हा पराभव झाल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर देशपातळीवरील संघटनेत त्यांना पद मिळालं. त्यांना विधान परिषदेत किंवा राज्यसभेत सामावून घेतलं जाईल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती.
२०१९ नंतर आजवर अनेकदा अशी संधी आली. विधान परिषदेच्या नियुक्त्या झाल्या. राज्यसभेची निवडणूक झाली. मात्र, पंकजा यांचं नाव प्रत्येकी वेळी मागे पडत गेलं. त्यामुळं त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. आता पुन्हा एकदा राज्यसभेची निवडणूक लागली आहे. त्यामुळं त्यांना आता तरी संधी मिळेल अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.
महाराष्ट्रातून सहा जागा राज्यसभेवर निवडून द्यायच्या आहेत. भाजप हा सध्या राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या आमदारांचं पाठबळही भाजपला आहे. त्यामुळं सहापैकी सर्वाधिक उमेदवार भाजपचेच निवडून जातील, असं चित्र आहे. भाजपकडून शिंदे आणि अजित पवार गटाला संधी दिली जाते का हेही पाहावं लागणार आहे.
राज्यातील राजकीय परिस्थिती सध्या प्रचंड बदलली आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या निर्णयामुळं ओबीसी समाजामध्ये नाराजीची भावना आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का बसला आहे असं खुद्द ओबीसी नेतेही मानत आहेत. ओबीसी समाजाचा पाठिंबा असलेल्या भाजपच्या विरोधात विशेष नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी भाजप ओबीसी समाजातील चेहऱ्याला राज्यसभेवर संधी देण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडे यांना संधी मिळू शकते, असं मानलं जात आहे.
पंकजा मुंडे यांच्या शिवाय सध्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी असलेले विनोद तावडे यांचीही राज्यसभेसाठी चर्चा आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तावडे यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. त्याचं कारणही पक्षानं दिलं नव्हतं. मात्र, तावडे यांनी निष्ठेनं पक्षाचं काम सुरू ठेवलं. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून ते उत्तम जबाबदारी पार पाडत आहेत. त्याचं बक्षीस त्यांना मिळेल, असा अंदाज आहे.
संबंधित बातम्या