पुणे : राजगड किल्यावर रात्री मुक्कामासाठी जाणार असाल तर ही बातमी आधी वाचा. गडावर कचरा आणि घाण होत असल्याचे कारण देत पुरातत्व विभागाने राजगड किल्यावर रात्री मुक्कामाला बंदी घातली आहे. या आदेशाचा दुर्गप्रेमींनी निषेध केला असून हे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राजगडावर अनेक दुर्गप्रेमी आणि पर्यटक येत असतात. अनेक पर्यटक रात्री टेंट बांधून या ठिकाणी मुक्काम करत असतात. दरम्यान, या मुळे गडावर अस्वच्छता होत असून अनेक पर्यटक कचरा करत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे गडाचे पावित्र्य जपण्यासाठी या गडावर रात्रीच्या मुक्कामी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र हे भोर उपविभागीय अधिकाऱ्यांना देखील देण्यात आले आहे.
या संदर्भात पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे म्हणाले, की राजगड किल्यावर अनेक पर्यटक रात्रीच्या मुक्कामाला येत असतात. दरम्यान, या पर्यटकांकडून चूल पेटवून तसेच या परिसरात कचरा टाकला जात असल्याच्या अनेक घटना पुढे आल्याने या गडावरील पर्यटकांचा रात्रीचा मुक्काम हा बंद करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या निर्णयानंतर सह्याद्री ट्रेकर्सने निषेध व्यक्त केला आहे.
तुमचे शासकीय नियम आहेत म्हणून हा आदेश काढला पण असेल तुम्ही, पण असे किती शासकीय नियम तुम्ही किल्ल्यांच्या बाबतीत पळता. काल परवाच राजगड केलेल्या चुकीच्या कामामुळे खूप मोठं रामायण झालं आहे. त्याचा तर बदला नाही ना घेत तुम्ही. अशी बरीच कामे अगोदरच तुम्हीच गडावर केली आहेत. आता तुम्ही कसल्या काळजी पोटी गड मुक्कामास बंद करणार आहात?, असा सवालही त्यांनी केला आहे.
संबंधित बातम्या