मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी केली फेसबुक पोस्ट, म्हणाले…

Raj Thackeray : गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी केली फेसबुक पोस्ट, म्हणाले…

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 02, 2022 10:33 AM IST

Mahatma Gandhi Jayanti 2022 : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त फेसबुकवर एक पोस्ट शेयर करून त्यांना अभिवादन केलं आहे.

Raj Thackerays FB Post On Mahatma Gandhi Jayanti 2022
Raj Thackerays FB Post On Mahatma Gandhi Jayanti 2022 (HT)

Raj Thackerays FB Post On Mahatma Gandhi Jayanti 2022 : आज जगभरात महात्मा गांधींची जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेक राजकीय नेत्यांनी महात्मा गांधींना अभिवादन केलं आहे. परंतु आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर एका खास पोस्ट शेयर करत गांधीजींबद्दल त्याचे विचार व्यक्त केले आहेत. गांधींचं संघर्षमय जीवन आणि तत्वनिष्ठबद्दलच्या विचारांची आठवण करत राज ठाकरेंनी त्यांना अभिवादन केलं आहे.

राज ठाकरेंनी त्यांच्या त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून पोस्ट शेयर करत म्हटलं आहे की, महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही. विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले, कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षातच मागे पडलेले दिसले आहेत, असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दुसरं महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल, जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले, पण त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली, ह्याला कारण चर्चिल ह्यांचं योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं, ते चिरकाल टिकावं असं नव्हतं. पण गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक होतं. शृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत, की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही, कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे, म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही, असं म्हणत त्यांनी गांधीजींच्या कार्याचं कौतुक करत त्यांना अभिवादन केलं आहे.

IPL_Entry_Point