बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे पैलूही समोर यायला हवेत; राज ठाकरेंची खास फेसबुक पोस्ट
Mahaparinirvana Day : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांना अभिवादन केलं आहे.
Raj Thackeray On Mahaparinirvana Day : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यामुळं देशातील राजकीय नेत्यांसह अनेक लोकांनी त्यांना अभिवादन केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही एका फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त करत बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा आदर आणि त्यांच्या कार्याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. याशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी काही पैलू लोकांसमोर यायला हवेत, असंही त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं आहे.
राज ठाकरेंनी शेयर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, शेकडो वर्षे गुलामगिरीत जगणाऱ्या वंचितांसाठी बाबासाहेबांनी यशस्वी लढा दिला. त्यानंतर त्यांनी भारतासाठी संविधान लिहिलं. परंतु त्यांच्या या कार्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू मराठी माणसाला आणि विश्वाला कळायला हवं, असं म्हणत राज ठाकरेंनी बाबासाहेबांबद्दलच्या महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत.
आपण आपल्या महापुरुषांना अत्यंत संकुचित दृष्टिकोनातून पाहतो, मानतो, जगासमोर मांडतो. पण महामानवाच्या महापरिनिर्वाणदिनी मला पुन्हा सांगावंसं वाटतं की आपल्या महापुरुषांचं अष्टावधानी कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त अफझल खानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची बोटं छाटणं, आग्र्याहून सुटका, सुरत स्वारी नाही तर त्यांचा राज्यकारभार, कृषी धोरण, राज्य कोष, वास्तू रचना, राज्य व्यवस्था, न्यायदान पद्धत अशी असंख्य गुण वैशिष्ट्य सांगता येतात.
बाबासाहेब अर्थशास्त्रात उच्च विद्या विभूषित होते. त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये मांडलेल्या ‘दी प्रॉब्लेम ऑफ दी रूपी’ ह्या प्रबंधाच्या प्रेरणेतून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. बालविवाह, बहुपत्नीत्व ह्यामुळे ‘स्त्री’ स्वत्व गमावून बसली होती. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी प्रयत्न केले पण तेव्हा त्यांना विरोध झाला. अखेर भारतीय समाजाने हळूहळू द्विभार्या प्रतिबंधक कायदा स्वीकारला, वडिलांच्या संपत्तीत लेकीला समान वाटा मिळाला, विवाहाच्या निर्णयात स्वातंत्र्य मिळालं.
त्याचवेळेस हा मानवतावादी कायदा आला असता तर आज चित्र वेगळे असते. असो. बाबासाहेबांनी स्त्रियांना बाळंतपणाची भरपगारी रजा, नारायण लोखंडे ह्यांच्या सहमतीने रविवारी कष्टकऱ्यांसाठी साप्ताहिक सुट्टी, कामाचे १२ वरून ८ तास, कामगार संघटनांना मान्यता, आरोग्य विमा, संपाचा कायदेशीर अधिकार अशा अनेक हक्कांसाठी लढा दिला आणि मान्यता मिळवून घेतली. इतकंच काय तर त्यांचं मराठी भाषेवर असणारं प्रभुत्व अद्भुत होतं आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं. माझ्या आजोबांच्या आवाहनानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी त्यांनी मांडलेली भूमिका ही चळवळीला शक्तिवर्धक ठरली, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.