Raj Thackeray On operation sindoor : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी म्हटले की, युद्ध हे काही दहशतवादावरील उपाय नाही. त्याऐवजी सरकारने दहशतवाद्यांना शोधून काढून त्यांचे नेटवर्क संपवले पाहिजे. दहशतवादी हल्ल्यामागील दोषींना पकडण्याला प्राधान्य द्यायला हवे.
राज ठाकरे म्हणाले, दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध होऊ शकत नाही. त्याउलट ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे त्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. मात्र पहलगाम हल्ला करणारे दहशतवादी अजून आपल्याला सापडले नाहीत. त्यामुळे देशात मॉक ड्रिल नाही तर कोम्बिंग ऑपरेशन करण्याची गरज आहे.
राज ठाकरेंनी सुरक्षा यंत्रणांच्या त्रुटींवर बोट ठेवत म्हटले की, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजून सापडलेले नाहीत. दरवर्षी हजारो पर्यटक जिथे जातात, तिकडे सुरक्षा का नव्हती, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांना कोम्बिंग ऑपरेशन करुन हुडकून काढणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याऐवजी एअर स्ट्राईक करुन लोकांचं लक्ष भरकटवणं किंवा युद्ध करणे हा पर्याय नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरे म्हणाले की, पहलगामला जो हल्ला झाला, मी त्याच्यावर टि्वट केलेले. ज्यांनी हल्ला केलाय, त्या अतिरेक्यांना, दहशतवाद्यांचा बंदोबस्त करा, त्यांना असा धडा शिकवा जो त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहिला पाहिजे. पाकिस्तान हा अगोदरच बर्बाद झालेला देश आहे. त्यांना आणखी काय बर्बाद करणार? सरकारने आपल्या समस्या जाणून युद्धाचा विचार करावा. अमेरिकेत दहशतवाद्यांनी ट्विन टॉवर पाडले आणि पँटागॉनवर हल्ला केला तेव्हा अमेरिकेने त्या दहशतवाद्यांना शोधून ठार मारले. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे प्रत्युत्तर नसते. त्यामुळे देशात मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करा. देशातील आपलेच प्रश्न संपत नाही, अशा परिस्थितीत युद्धाला सामोरे जाणे योग्य गोष्ट नाही.
राज ठाकरे म्हणाले, सरकार जिथे चुकते तिथे चुका दाखवल्याच पाहिजेत. पहलगाम हल्ल्यावेळी पंतप्रधान मोदी सौदी अरेबियात होते. तो दौरा अर्धवट सोडून ते भारतात आले आणि थेट बिहारला प्रचाराला गेले. हे टाळायला हवे होते. त्यानंतर मोदी केरळमध्ये अदानींच्या बंदराचे उद्घाटन करायला गेले. यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित व्हेव कार्यक्रमाला उपस्थिती लावली. देशात इतकी गंभीर परिस्थिती असताना या गोष्टी टाळता आल्या असत्या, असे खडे बोल राज ठाकरे यांनी सुनावले.
सिंदूर या लष्करी कारवाईत दहशतवादी मसूद अजहरच्या कुटूंबातील १४ लोक मारले गेल्याचा दावा केला जात आहे. 'ऑपरेशन सिंदूर' वरून संपूर्ण देशात भारतीय लष्कर व पंतप्रधान मोदींचे कौतुक केले जात असताना राज ठाकरेंनी यावर टीका करत सरकारला आरसा दाखवला आहे.
संबंधित बातम्या