‘मी मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याचं कारण..; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंकडून 'तो' Video पोस्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘मी मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याचं कारण..; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंकडून 'तो' Video पोस्ट

‘मी मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याचं कारण..; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंकडून 'तो' Video पोस्ट

Published Oct 04, 2024 12:11 AM IST

RajThackeray: नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा मी दिला होता,त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा'ही होती., असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे
राज ठाकरे

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी माय मराठीला मोठा बहुमान मिळाला असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मोठा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर १३ कोटी मराठी जनतेचं स्वप्न साकार झाल्याची भावना आहे. सरकारच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत आपण कशासाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता, याचे कारण सांगितलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी भाषण करताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली होती. या भाषणाचा व्हिडिओ राज ठाकरेंनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफार्म एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे.

मराठीच्या अभिजात दर्जाबाबत काय म्हणाले राज ठाकरे?

आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात नरेंद्र मोदी यांच्यासमोर केली होती. तेव्हा नरेंद्र मोदी एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा मी दिला होता,  त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा ही होती.

माझा पाठींबा बिनशर्त आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. अर्थात बिनशर्त म्हणजे माझ्या पक्षाला हे द्या ते द्या यापेक्षा माझ्या राज्यासाठी, माझ्या भाषेसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यातल्या एका मागणीची आज पूर्तता झाली. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तमाम केंद्रीय मंत्रिमंडळाचे देखील खूप आभार.

मुळात एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो म्हणजे काय होतं हे समजून घ्यायला हवं आणि ते मिळण्याचे निकष काय होते हे देखील समजून घेऊया. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे सर्वसाधारण निकष काहीसे असे आहेत...

•भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे १५००-२००० वर्षं जुना हवा.

•या भाषेत प्राचीन साहित्य हवं.

•भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं,ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.

•'अभिजात'भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी. २०१२ साली ज्येष्ठ साहित्यिक श्री. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारला अहवाल देण्यासाठी एक समिती नेमली गेली होती. त्या समितीने आपला अहवाल २०१३ साली प्रकाशित केला होता. हा अहवाल माझ्या ग्रंथ संग्रहालायत दर्शनी भागात मी मुद्दामून ठेवला आहे. आणि काही महिन्यांपूर्वी रंगनाथ पाठारे यांच्याशी झालेल्या भेटीत देखील या अहवालावर चर्चा झाली होती. असो... तर,आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय नक्की गोष्टी घडतील...

•मराठीच्या बोलींचा अभ्यास,संशोधन,साहित्यसंग्रह करायला अधिक चालना मिळेल.

•भारतातील सर्व४५०विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल.

•प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला प्रोत्साहन मिळेल.

•महाराष्ट्रातील सर्व १२,००० ग्रंथालये सशक्त होतील.

•मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था,व्यक्ती,विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत येईल.

  • प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल.
  • अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येईल.

या सर्व गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा न मिळता देखील होतीलच की, असा युक्तिवाद येऊ शकतो. पण आपली भाषा ही इतकी प्राचीन भाषा आहे,जी संतांची भाषा होती, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा होती, ही भाषा पराक्रमाची, सर्वोत्तम साहित्याची भाषा आहे, अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये हा माझ्या पक्षाचा मुद्दा होता. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खूप जुनी आहे. आम्ही २५ सप्टेंबर २०१४ रोजी महाराष्ट्राचा जो विकास आराखडा सादर केला होता, त्यात देखील ही मागणी होती. आणि वेळोवेळी यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरु होता.जवळपास १२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा दर्जा मिळाला, हाच माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी आनंदाचा क्षण. आज हा जो दर्जा मिळाला आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निःसंशय अविश्रांत पाठपुरावा केला आहे आणि त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन. प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची भाषा घेऊन येतो,आपण सगळे जणं मराठी ही भाषा जन्माला घेऊन आलो आहोत. ही भाषाच आपली ओळख आहे,आपली अस्मिता आहे. या भाषेला आता ज्ञानाची, व्यापारउदीमाची आणि जागतिक विचारांची भाषा बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे,ही माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आहे आणि हेच आमचं अंतिम ध्येय आहे. पुन्हा एकदा मराठी जनांचे अभिनंदन...

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर