धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याच्या मागणी विरोधात तसेच आपल्या विविध मागण्यांसाठी गेले काही दिवस आंदोलन करणारे राज्यातील आदिवासी समाजाचे आमदार आज प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले. शुकवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदारांनी थेट मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावर लावलेल्या संरक्षक जाळीवर उड्या मारून आपला निषेध व्यक्त केला.
आंदोलन करणाऱ्या आमदारांमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष,राष्ट्रवादी कॉंग्रेस -अजित पवार गटाचे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, पालघरचे भाजप खासदार हेमंत सावरा, राष्ट्रवादी काँग्रेसच-अजित पवार गटाचे अकोलेचे आमदार किरण लहामटे, बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील या आदिवासी समाजातील आमदारांचा समावेश होता. आमदारांच्या निषेध करण्याच्या पद्धतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीटीका केली आहे.
सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आणि इतर दोन आमदारांनी, आदिवासी समाजवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळीवर उड्या मारून,म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध? सत्तेशिवाय राहू शकत नाही,असं म्हणणं शक्य नव्हतं, म्हणून' जनतेच्या सेवेला सत्ता हवी', म्हणत तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना? सत्ता आली तरी तुम्ही स्वतःचं सोडून कोणाचंही भलं करू शकत नाही हे नक्की.
बरं मुळात तुम्ही सत्ताधारी, त्यात पुन्हा संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय? आदिवासी जनतेबद्दल खरंच कळवळा असेल तर, आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी, ज्यांनी आदिवासी हे मागासच राहतील हे पाहिलं त्या सगळ्यांनी संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस करून ठेवली आहे. त्या सर्कसीत तोफेच्या आत जाऊन नंतर तिकडून बाहेर जाळ्यात फेकला जाणारा माणूस आठवतोय?तसं या सगळ्यांचं झालं आहे, आता जनतेच्या तोफेच्या तोंडी जायची वेळ आली आहे, मग आपणच स्वतः जाळ्यावर उड्या मारा.
राज ठाकरेंनी म्हटले की, माझी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे की यांना तोफेच्या तोंडी जाणं म्हणजे नक्की काय असतं हे या निवडणुकीत दाखवूनच द्या. तुम्हाला गृहीत धरायचं,तुमच्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद करायच्या आणि नंतर स्वतः पोरकट चाळे करायचे, या सगळ्याला झटका देण्याची, ही विकृत झालेली व्यवस्था उलथवून टाकण्याची संधी आजपासून काही आठवड्यात तुम्हाला येणार आहे. आणि या वेळेस जर तुम्ही योग्य पाऊल उचललं नाहीत तर मात्र हे लोकं परिस्थिती अधिक विदारक करतील आणि संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट करतील.तेंव्हा वेळ जायच्या आत जागे व्हा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या