मागील दोन दिवसांपासून मुंबई पावसाची संततधार सुरु आहे. आज देखील मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर दिसत आहे. मुंबई व उपनगरात पुढील ३-४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पुढील ४८ तासात मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येत्या ३ ते ४ तासांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मुंबईत तुरळक ठिकाणी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळी साडे आठ वाजेपर्यंत मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या मुंबई विभागाने मुंबई आणि शहराच्या काही भागात आज (सोमवारी) संध्याकाळी किंवा रात्री जोरदार वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आयएमडीने ताज्या अंदाजात म्हटले आहे की, पुढील तीन ते चार तासात मुंबईत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
पालघर , ठाणे, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने सोमवारी यलो अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या माघारीमुळे रविवारी सायंकाळी मुंबईतील अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सध्या मान्सूनची परतीची रेषा ओडिशातील गोपाळपूर, छत्तीसगडमधील रायपूर, महाराष्ट्रातील नंदुरबार, मध्य प्रदेशातील खरगोन आणि गुजरातमधील नवसारी येथून जात असून, येत्या दोन दिवसांत संपूर्ण देशातून मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे आग्नेय बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावाखाली कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते आता आणखी बळकट होऊन दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्य भागाकडे सरकले आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. येत्या २४ तासांत हे चक्रीवादळ आणखी तीव्र होऊन डीप डिप्रेशनमध्ये रुपांतरित होण्याची शक्यता आहे. यामुळे श्रीलंकेच्या पूर्व किनारपट्टीआणि नैर्ऋत्य बंगालच्या उपसागराच्या किनारी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी आणि किनारपट्टी भागात ताशी ८० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील ३६ तासात किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, तामिळनाडूच्या किनारपट्टीवर चेन्नई ते कन्याकुमारीपर्यंत १५ ऑक्टोबरच्या रात्रीपासून ते १६ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूच्या किनारपट्टीचा मध्य भाग जसे पुद्दुचेरी, कराईकल, नागपट्टिनम, तोंडी, तूतीकोरिन सारख्या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे होणारा मुसळधार पाऊस राज्याच्या अंतर्गत भागापर्यंत पसरू शकतो, असे आयएमडीने म्हटले आहे. यामुळे त्रिची, मदुराई, तंजावूर, इरोड, करूर, तिरुपूर, कोईम्बतूर आणि उटी मध्ये तीव्र परिस्थिती उद्भवू शकते. केरळ, कर्नाटकातही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या