रेल्वे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; मुंबई शहरातून केली ६१५ मुलांची सुटका
घरातील भांडण, कौटुंबिक समस्या, शहरातील ग्लॅमरचे आकर्षणामुळे अनेक मुले आपल्या कुटुंबियांना न सांगता मुंबईत येत असतात… (Railway Police Force rescued 615 children in Mumbai)
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या रेल्वे पोलीस दलाच्या जवानांवर केवळ रेल्वेची मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेचीच जबाबदारी नसते. तर अनेक भरकटलेल्या, हरवलेल्या मुलांची सुटका करून त्यांच्या आईवडिलांकडे सोपवण्याची जबाबदारी ते पार पाडत असतात. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेवरील विविध रेल्वे प्लॅटफॉर्मवरील हरवलेल्या एकूण १३९९ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ९४९ मुलगे आणि ४५० मुलींचा समावेश आहे. चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे.
काही घरातील भांडण, कौटुंबिक समस्या, शहरातील ग्लॅमरचे आकर्षण किंवा चांगले जीवन इत्यादींच्या शोधात अनेक मुले आपल्या कुटुंबियांना न सांगता मुंबईत येत असतात. शहरात आल्यानंतर विविध रेल्वे स्थानकावर येणाऱ्या मुलांना शोधण्याचे काम मध्य रेल्वेचे रेल्वे सुरक्षा दल (Railway Protection Force), शासकीय रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी करत असतात. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत हे काम केलं जातं. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालकांनी त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्वाधिक ६१५ मुलांची सुटका केली आहे. यात ४४१ मुलगे आणि १७४ मुलींचा समावेश आहे. तर भुसावळ विभागाने २८४ मुलांची सुटका केली आहे. यात १५० मुलगे आणि १३४ मुलींचा समावेश आहे.
पुणे विभागाने २८५ मुलांची सुटका केली असून त्यात २३३ मुलगे आणि ५२ मुलींचा समावेश आहे.
नागपूर विभागाने १५७ मुलांची सुटका केली असून यामध्ये ८९ मुलगे आणि ६८ मुलींचा समावेश आहे.
सोलापूर विभागातून बचावलेल्या ५८ मुलांमध्ये ३६ मुलगे आणि २२ मुलींचा समावेश असल्याचे रेल्वे विभागातर्फे सांगण्यात आले.
संबंधित बातम्या