Rahul Gandhi News: काँग्रसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर पोहोचताच त्यांनी कुठल्याही हॉटेलवर न जाता शहरालगतच्या उचगावातील एका टेम्पो चालकाच्या घरी भेट दिली. तिथे त्यांच्यासोबत घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला. राहुल गांधींनी गरीब कुटुंबाची भेट घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राहुल गांधी आज सकाळी कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. यानंतर ते कुठल्याही हॉटेलला न जाता त्यांनी उचगावमधील एख कौलारू घर गाठले. उचगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील अजित तुकाराम संधे यांच्या घरी राहुल गांधींनी भेट दिली. जवळपास अर्धातास राहुल गांधींनी संधे कुटुंबाशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधींनी संधे यांच्या घरात वांग्याची भाजी आणि कांद्याची पात खाल्ली. राहुल गांधी अचानक घरी आल्याचे पाहून संपूर्ण संधे कुटुंब भारावून गेले. एका वृत्त वाहिनीशी बोलताना संधे कुटुंबाने आपली प्रतिक्रिया दिली.
राहुल गांधी यांनी कोल्हापूरमधील आपल्या भाषणात भाजपवर जोरदार टीका केली. ‘आपली लढाई संविधान वाचवण्याची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा. मी शिक्षण घेत असताना अस्पृश्यतेसंदर्भात अनेक पुस्तके वाचायला मिळाली. दलित आणि मागासवर्गीय यांचा इतिहास आता पुसून टाकला जात आहे’, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
‘भारतीय संविधान हे शिवाजी महाराजांच्या विचाराचे प्रतिक आहे. मात्र, देशातील एक विचारधारा हे संविधान संपवण्याचे प्रयत्न करत आहे. हे संविधान वाचवण्यासाठी आपण लढा दिला पाहिजे. तर, आपण छत्रपती शिवरायांच्या विचारांच पाईक ठरु’, असे राहुल गांधी यानी म्हटले.
आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवावी आणि कोणतीही शक्ती त्याला रोखू शकणार नाही, याची खात्री आम्ही लोकसभा आणि राज्यसभेत करू. राज्यघटनेच्या रक्षणासाठी ही ५० टक्के मर्यादा हटविणे आवश्यक आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. दोन डझनहून अधिक विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष जातीनिहाय जनगणनेसाठी कायदे आणतील, असे राहुल गांधी यांनी संविधान सन्मान परिषदेत सांगितले.
महिनाभरात राहुल गांधी यांचा पश्चिम महाराष्ट्राचा हा दुसरा दौरा आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी ते गेल्या महिन्यात सांगलीत आले होते. २०१४ आणि २०१९ मध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांच्या पक्षाने अनुक्रमे कोल्हापूर आणि सांगली लोकसभेच्या जागा शिवसेना आणि भाजपकडून हिसकावून घेतल्या.
संबंधित बातम्या