Rahul Solapurkar News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबद्दल वादग्रस्त विधानं करणारे अभिनेता राहुल सोलापूरकर याच्यावर टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी व रिपब्लिकन पक्षाचे सचिन खरात यांनी सोलापूरकर यांच्यावर जहरी टीका केली आहे. सोलापूरकरनं महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.
'शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. मिठाईच्या पेटाऱ्यातून सुटले ही दंतकथा आहे. त्यावेळी पेटारे वगैरे काही नव्हतं, असं राहुल सोलापूरकर एका पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
'हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचं व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीनं इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मूर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खानं आपल्या तोंडाला टाळं लावावं. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठं आहे, हे याला रायगडावर नेऊन दाखवावं लागेल, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे. ह्यानं महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.
राहुल सोलापुरकर ह्यानं आपण टकलू हैवान असल्याचं सिद्ध केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेलं वादग्रस्त विधान हे आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणून कधीच खपवून घेतली जाणार नाही, अशी टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून स्वकर्तृत्वावर निसटले हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला असताना जाणीवपूर्वक राहुल सोलापुरकर यानं छत्रपती शिवरायांची बदनामी करण्याची एक चाल खेळली आहे. याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी सभागृहात करेल, असं अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राहुल सोलापूरकर यांचं शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. मुळात यांच्या मनातच बहुजन राजांबद्दल द्वेष आहे, हेच यातून दिसून आलंय. भाजप सरकार आल्यापासून अनेकांच्या मनातील खरे विचार उफाळून येत आहेत. सोलापूरकर यांची ब्राह्मणवादी मानसिकता बाहेर आलीय. त्यांचं डोकं फिरलंय. त्यांना ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका, वक्तव्य केले आहे, असा संताप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट पक्षाचे सचिन खरात यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या