Pune-Mumbai trains cancelled : पुण्यातून मुंबईला कामाला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हे नागरिक रोज रेल्वेने अपडाऊन करत असतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे तसेच आज देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या तब्बल आठ एक्सप्रेस गाड्या रद्द कऱण्यात आल्या आहेत.
यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. रेल्वे नअसल्याने प्रवाशांना इतर पर्यायी साधनांनी प्रवास करावा लागला. तर पुणे-मुंबई दरम्यानच्या घाट परिसरावर लक्ष ठेवण्याच्या तसेच दरड कोसळल्यास तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासाने दिलेल्या माहितीनुसार रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्याने तसेच पावसाचा अतिवृष्टीचा इशारा असल्याने पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून मुंबईसाठी सुटणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. याचबरोबर मुंबईहून पुण्यासाठी सुटणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, आणि डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. येथील पाणी कमी झाल्यावर या गाड्यांची सेवा पुर्ववत करण्यात येणार आहेत.
मुंबई आणि पुण्यात आज देखील पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने या जिल्ह्यांना ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केला आहे. तर काल झालेल्या पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून या पाण्याचा अद्याप निचरा झाला नाही. ट्रॅकवर पाणी साठले असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही शहरादरम्यान धावणाऱ्या महत्वाच्या रेल्वेगाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. नागरिकांना झालेल्या गैरसोईबद्दल रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या