Pune lonikand Theur road accident : नवीन मोटार खरेदी केल्यानंतर थेऊर येथील चिंतामणी गणपतीच्या दर्शनाठी गेलेल्या एकाच कंपनीतील तीन मित्रांवर काळाने घाला घातला आहे. दर्शन घेऊन परत येत असतांना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना थेऊर-लोणीकंद रस्त्यावर जोगेश्वरी मंदिरासमोर सोमवारी रात्री ८ च्या सुमारास घडली.
गणेश सुखलाल जाधव (वय ३५), विनोद तुकाराम भोजणे (वय ३६), विठ्ठल प्रकाश जोगदंड (वय ३६, तिघेही रा. एल अँड टी फाटा, सणसवाडी, सोलापूर रस्ता) अशी अपघातात ठार झालेल्यांची नवे आहेत. हेमंत लखमन दलाई (वय ३०, रा. पाबळ चौक, शिक्रापूर, ता. शिरूर) हा गंभीर जखमी झाला आहे. त्यांचावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाता प्रकरणी ट्रकचालक मच्छिंद्र तुकाराम जाधव (रा. गावठाण, काराठी, ता. बारामती) याला अटक करण्यात आली असून बेदरकारपणे आणि वाहतूक नियमांची पायमल्ली केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळचंद्र शिवाजी पांचाळ (वय ३६, रा. बालाजी पार्क, केसनंद रस्ता, वाघोली, मूळ रा. कौठाळा, जि. लातूर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश सुखलाल जाधव, विनोद तुकाराम भोजणे, विठ्ठल प्रकाश जोगदंड, हेमंत लखमन दलाई हे चौघे मित्र असून ते रांजणगाव एमआयडीसीमधील ‘स्टेरीऑन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ येथे काम करतात. गणेश जाधव याने नवीन कार घेतल्यावर हे सर्व मित्र थेऊर येथील चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. रविवारी दोन मोटारी घेऊन ते देवदर्शनासाठी गेले होते. नव्या कारमध्ये भोजणे, जोगदंड, जाधव आणि दलाई हे चौघे जण बसले होते. दुसऱ्या मोटारीमध्ये फिर्यादी पांचाळ आणि त्यांचे अन्य चार मित्र बसलेले होते. देव दर्शन आटोपल्यावर हे सर्वजण लोणीकंद-थेऊर रस्त्याने पुन्हा परत निघाले होते.
यावेळी केसनंदकडून लोणीकंदकडे जाणाऱ्या रस्त्यावर जोगेश्वरी मंदिरासमोर भरधाव ट्रकने जाधव यांच्या मोटारीला समोरून धडक दिली. या भीषण अपघातात नव्या गाडीचा चक्काचूर झाला. यात तिघाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. या आपघातानंतर पांचाळ व त्यांच्या मित्रांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांनी देखील तातडीने या अपघाताची माहिती पोलिसांना देत मदत कार्य सुरू केले. पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी आली. गाडीमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढतांना अडचणी येत होता. सर्वांना बाहेर काढून उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी जाधव, भोजणे आणि जोगदंड यांना मृत घोषित केले.
जाधव, भोजणे आणि जोगदंड हे तिघेही विवाही आहे. या घटनेमुळे त्यांच्यावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. कामानिमित्ताने हे सर्वजन विविध जिल्ह्यांमधून पुण्यात आले होते.
संबंधित बातम्या