मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. लग्नाची मागणी घातली म्हणून संतापलेल्या मुलीच्या बापाने व नातेवाईकांनी केलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. हा भयंकर प्रकार पुण्यात घडला आहे. मुलीला लग्नाची मागणी घालणाऱ्या तरुणाचा चार जणांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. ही घटना गोखलेनगर भागातील शहीद तुकाराम ओंबाळे मैदानात घडली आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे तर दोन जण फरार आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिलीप यल्लपा अलकुंटे (वय ४५, रा. जनता वसाहत) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रामजी निलू राठोड (वय ५०), अनुसया रामजी राठोड (वय ४५), करण रामजी राठोड (वय १९) अशी आरोपींची नावे आहेत. यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, जखमीचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी रामजी व अनुसया या दाम्पत्याला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (१ फेब्रुवारी) रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. प्रकरणी मृत दिलीप अलकुंटे यांच्या वहिनी पुष्पा राजेश अलकुंटे यांनी चतुः श्रृंगी पोलिस फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप अलकुंटे यांच्या पत्नीचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. ते एका गॅरेजमध्ये काम करतात. तर आरोपी रामजी राठोड बिगारी कामगार म्हणून काम करतो. दिलीप अलकुंटे यांनी रामजी राठोड यांच्याकडे त्यांच्या मुलीशी लग्न करायची इच्छा व्यक्त केली होती. मात्र मुलीचे वय कमी असल्याने आरोपींनी तुझे वय काय व आमच्या मुलीचे वय काय म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. चार जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत दिलीप गंभीर जखमी झाला. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा रविवारी सकाळी मृत्यू झाला.
संबंधित बातम्या