‘मविआ’ला आणखी एक धक्का, १६ आमदारांचे क्रॉस वोटिंग, शरद पवारांची रणनितीही फेल?
मोदी-शाहच्या रणनितीने राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच राष्ट्रपती निवडणुकीतही महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. द्रौपदी मूर्मू यांना राज्यातील१६ अधिकआमदारांची मते मिळाली आहेत.
मुंबई – देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची निवड झाली आहे. आज जाहीर झालेल्या निकालात मुर्मू यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. मात्र या निवडणुकीत मोदी-शाहच्या रणनितीने राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच राष्ट्रपती निवडणुकीतही महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे गट, भाजप यांच्या व्यतिरिक्त शिवसेनेनेही द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा दिला होता. मात्र त्या व्यतिरिक्त द्रौपदी मूर्मू यांना राज्यातील १६ अधिक आमदारांची मते मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याचा महाराष्ट्राच्या आगामी राजकारणावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
‘ते’ १६ आमदार कोणत्या पक्षाचे?
राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवत, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते फोडल्याचा संशय आहे. आता एकनाथ शिंदे आणि भाजपा यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचा डाव असल्याचे सांगण्यात येत होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फुटलेली १६ मते ही काँग्रेस-राष्ट्रवादीतील असल्याचा दाट संशय आहे. कारण शिवसेनेने या निवडणुकीत द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा जाहीर केला होता. देशभरात १०४ आमदरांची मते फुटली असून, ते क्रॉस वोटिंग द्रौपदी मुर्मू यांना मिळाले आहे. राज्यातील मतेही फुटल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वापुढे आव्हान निर्माण झाले आहे. शरद पवारांनी राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन यावेळी मोर्चेबांधणी केली होती. मात्र तरीही आमदारांनी पक्षाविरोधात मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातून मुर्मू यांना २०० मते मिळण्याचा व्यक्त केला अंदाज -
राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी शिंदे गट आणि भाजप आमदारांची हॉटेल ट्रायडन्टमध्ये बैठकी झाली होती. त्यावेळी द्रौपदी मुर्मु यांना राज्यातून जवळपास २०० मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यात भाजप १०६ , शिंदे गट ५० असे मिळून १७० जण होते. तसेच उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिल्याने शिवसेना आमदारांची १६ मतेही राष्ट्रपती निवडणुकीत मूर्मुंना मिळाली होती. हा सगळा आकडा १८५ च्या आसपास जातो. त्यामुळे भाजपने सांगितल्याप्रमाणे १६ मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.