anna bhau sathe death anniversary : प्रतिभावंत साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदन आहे. त्या निमित्तानं सामाजिक, साहित्यिक व राजकीय वर्तुळातून त्यांच्या विचारांचा जागर केला जात आहे. सोशल मीडियामध्ये त्यांचे विचार शेअर केले जात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी अण्णाभाऊंना अभिवादन केलं आहे.
'अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरीद्वारे सामाजिक क्रांतीची बीजे समाजात रोवली. तळागाळातील माणसांच्या दु:खाची ओळख आपल्या प्रभावशाली लिखाणातून करून दिली, अशा शब्दांत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं श्रद्धांजली वाहिली आहे.
समाजात नवचैतन्य निर्माण करण्याची ताकत ज्यांच्या लेखणीत होती, अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन, असं भाजपनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे प्रतिभावंत साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक आणि थोर लोकनाट्यकार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मी जे जीवन जगतो, अनुभवतो, तेच मी लिहितो... हे अण्णाभाऊ साठे यांचं वाक्य उद्धृत करून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं आहे. प्रतिभावंत साहित्यिक, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे लोकनायक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनी भावपूर्ण अभिवादन, असं त्यांनी म्हटलं आहे.
अण्णाभाऊ साठे यांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देत, साहित्याच्या माध्यमातून शोषित आणि वंचितांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. तळागाळातील लोकांना जगण्याची दिशा त्यांच्यामुळे मिळाली. त्यांच्या कार्याचा आदर आणि स्मरण सदैव आपल्या हृदयात जागृत राहील, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मज भीमराव..!
पृथ्वी ही नागाच्या फण्यावर तरली नसून, कष्टकरी व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. असं ठणकावत मनामनात क्रांतिची ठिणगी पेटविणारे, शोषितांच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वाहणारे, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, कष्टकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस, असं सांगणारे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीनं अण्णाभाऊंना श्रद्धांजली वाहिली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेत त्यांना अभिवादन केलं आहे. आपल्या सोशल पोस्टमध्ये आंबेडकर म्हणतात, साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारं आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमाणसात रुजविण्याचं काम शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केलं. त्यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या आहेत. नाटक, वगनाट्य, कवन, लावणी असं बहुविध साहित्य त्यांनी लिहिलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काम करताना लिहिलेली त्यांची ‘माझी मैना’ ही छक्कड आजही तमाम महाराष्ट्राच्या ओठावर आहे. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकीय लढ्याची पताका सर्व वंचित, पीडित, सर्वहारा वर्गाने आपल्या खांद्यावर घ्यावी असा संदेश देताना 'जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव...' असे म्हणणाऱ्या लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
संबंधित बातम्या