Patra Chawl : “शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर..”; भाजपचे गंभीर आरोप, फडणवीसांना पत्र
पत्राचाळ घोटाळ्यात (Patra Bhawl Case) ईडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. आता भाजपचे प्रवक्ते व आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांचे नाव जोडून याची सखोल चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
मुंबई – मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात (Patra Bhawl Case) शिवसेनेचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. आता याच प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
पत्राचाळ घोटाळ्यात ईडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत असून आर्थर रोड तुरुंगात मुक्कामी आहेत. याबाबत आता भाजपचे प्रवक्ते व आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांचे नाव जोडून याची सखोल चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे,यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री सुद्धा उपस्थितीत होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये काँग्रेस,राष्ट्रवादीचा आणि संजय राऊत यांचा काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी,अशी मागणी भातखळकर यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
भातखळकर यांनी यासंदर्भात तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्र दिलेले आहे. या वरून स्पष्ट होते की,म्हाडा जरी प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता आणि त्यामुळे या चौकशीच्या प्रकरणाचे धागेदोरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात आहेत,असा आरोपही भातखळकर यांनी केला आहे.