साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून यंदाच्या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ लेखिका प्रा. आशालता कांबळे, लेखक शाहू पाटोळे, पत्रकार सुकन्या शांता यांची निवड झाली आहे. सोबतच 'सूर्य गिळणारी मी' या आत्मकथनासाठी अरुणा सबाने यांना यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत 'बलुतं' पुरस्कार जाहीर झाला आहे.
रविवार, २० ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता दादर-माटुंगा कल्चरल सेंटर, माटुंगा (प.), मुंबई येथे लोकशाहीर संभाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली दया पवार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी देशभरातील विविध ठिकाणच्या आदिवासी समूहांमध्ये परंपरेने जपलेल्या संगीत कलेचे दस्तऐवजीकरण आणि त्यांचे सादरीकरण करणाऱ्या गायिका-संशोधक प्राची माया गजानन यांच्या ‘आदिवासी संगीत यात्रा - सप्रयोग आख्यान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाचा हा २६ वा पुरस्कार सोहळा असून प्रत्येकी दहा हजार रुपये रोख आणि चित्रकार षांताराम पवार यांच्या संकल्पनेतू साकारण्यात आलेले सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दया पवार स्मृती पुरस्कारांच्या यंदाच्या मानकरी ठरलेल्या प्रा. आशालता कांबळे या फुले-आंबेडकरी चळवळीतील एक तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्या, परखड वक्त्या, संविधान मूल्यांच साहित्य लिहिणाऱ्या लेखिका, कवयित्री, समिक्षिका म्हणून परिचित आहेत. गेली चाळीस वर्ष त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हजाराच्यावर प्रबोधनात्मक व्याख्याने दिलेली आहेत. 'बहिणाबाईंच्या कविता: एक आकलन', 'यशोधरेची लेक' हा कवितासंग्रह, 'आमची आई', 'समर्थ स्त्रियांचा इतिहास' ही त्यांची विशेष गाजलेली पुस्तके आहेत.
दया पवार स्मृति पुरस्काराचे दुसरी मानकरी ठरलेले शाहू पाटोळे यांनी आठ वर्षांपूर्वी दलितांच्या खाद्य, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाबाबत 'अन्न हे अपूर्णब्रह्म’ हे विलक्षण पुस्तक लिहिले. दोन महिन्यांपूर्वी हे पुस्तक 'दलित किचन्स इन मराठवाडा' नावाने इंग्रजीत प्रकाशित झाले. अलीकडेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शाहू पाटोळे यांचा एक व्हिडियो चर्चेत आला होता. कोल्हापूरमध्ये राहुल गांधींनी शाहू पाटोळेंसोबत दलितांच्या घरात शिजणाऱ्या अन्नासोबतच दलितांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयावर सुमारे दीड तास चर्चा केली. शाहू पाटोळे भारतीय माहिती सेवेतील (आयआयएस) निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी संरक्षण दलातील जनसंपर्क खात्यात (डिफेन्स पीआरओ), पीआयबी, आकाशवाणी आणि दूरदर्शनसारख्या संस्थांसाठी देशातील वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आहे.
दया पवार स्मृति पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्या सुकन्या शांता या मुंबईस्थित धडाडीच्या पत्रकार आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या इंग्रजी पत्रकारितेत कार्यरत आहेत.
दया पवार प्रतिष्ठानतर्फे गेल्या पाच वर्षांपासून चर्चेत असलेल्या आत्मकथनांना ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार देण्यास सुरूवात झाली असून यंदाच्या 'बलुतं' पुरस्कारासाठी विदर्भातील ज्येष्ठ लेखिका अरुणा सबाने यांची निवड करण्यात आली आहे. ‘सूर्य गिळणारी मी’ या आत्मकथनासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे
संबंधित बातम्या