करोनाची प्राणघातक साथ मानवजातीला खूप काही शिकवून गेलीय. शरीराचे तापमान, रक्तदाब, रक्तशर्करेचे प्रमाण, हृदयाचे ठोके याप्रमाणेच आजकाल श्वासोच्छवासातील प्राणवायूच्या (ऑक्सिजन) पातळीवरही काटेकोर लक्ष ठेवणे गरजेचे बनले आहे. फुफ्फुसांच्या आजारांनी दुर्बळ रुग्णांसाठी शुद्ध प्राणवायूचा तत्काळ पुरवठा अत्यंत मोलाचा ठरत आहे आणि एका श्वासाची किंमत जगाला आता उमगू लागली आहे.
‘प्रतिभा प्रभाकर पल्मोनरी रिहॅबिलीटेशन सेंटर’च्या वतीने श्वसन संस्थेचे आरोग्य आणि प्राणवायूचे महत्त्व अधोरेखित करणारा एक कार्यक्रम नुकताच गोरेगावमध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी उद्योजक धनंजय दातार यांनी फुफ्फुसाच्या विकाराने ग्रस्त, परंतु आर्थिक असहाय्यतेमुळे प्राणवायू पुरवठा उपकरणे खरेदी न करु शकणाऱ्या ३ गरजू रुग्णांना स्वखर्चाने उपकरण संच भेट दिले. प्रत्येक संचात घरात हवा तेव्हा प्राणवायू पुरवठा करणारे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, घराबाहेर किंवा प्रवासात प्राणवायू पुरवणारे पोर्टेबल ऑक्सिजन मशीन व ऑक्सिमीटर या उपकरणांचा समावेश होता. याआधी गेल्या वर्षीही ५ रुग्णांना दातार यांनी अशीच मदत केली आहे.
याप्रसंगी बोलताना धनंजय दातार म्हणाले, ‘माझ्या आईच्या अखेरच्या दिवसांत ती फुफ्फुसाच्या आजाराने गलितगात्र झाली होती. श्वासोच्छवासासाठीची तिची धडपड मला बघवत नव्हती. आजही अशा आजारांनी ग्रस्त गरीब रुग्णांचे हाल मला अस्वस्थ करतात. करोना साथीच्या काळात तत्काळ प्राणवायू न मिळाल्याने अथवा वाहनाच्या अनुपलब्धतेमुळे रुग्णालयात वेळेवर पोचू न शकल्याने अनेक रुग्ण दगावले. त्यावर उपाय म्हणून मी व माझ्या समूहाने ऑक्सिजन सिलेंडरने सज्ज ‘रिक्षा ॲम्ब्युलन्स’ या अभिनव उपक्रमाला आर्थिक पाठबळ पुरवले. गेल्या वर्षी आणि यंदाही पैशाअभावी प्राणवायू उपकरणे खरेदी करु न शकणाऱ्या रुग्णांना आम्ही प्राणवायू संच भेट दिले आहेत आणि यापुढेही गरीब गरजूंना अशीच मदत करत राहणार आहोत.’
फुफ्फुसाच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या पुनर्वसन कार्याचा दीर्घ अनुभव असणाऱ्या डॉ. पूर्वी देवानी याप्रसंगी म्हणाल्या, ‘सकारात्मक दृष्टीकोण, योग्य उपचार, नियमित व्यायाम या जोरावर फुफ्फुसाच्या आजारांचे रुग्ण सर्वसाधारण आयुष्य जगू शकतात. आम्ही अशा रुग्णांचे समुपदेशन तथा यशस्वी पुनर्वसन करुन त्यांना आनंदी जीवन जगायला शिकवतो.’
‘प्रतिभा प्रभाकर पल्मोनरी रिहॅबिलीटेशन सेंटर’चे संस्थापक चालक डॉ. प्रल्हाद प्रभुदेसाई म्हणाले, ‘आयुष्य आरोग्यपूर्ण घालवणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठीच सर्वांनी आरोग्य, योग्य जीवनशैली व श्वासाचे महत्त्व ओळखणे गरजेचे आहे.’ वैशाली प्रभुदेसाई यांनी यावेळी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
संबंधित बातम्या