Onion Price Hike In Maharashtra : केंद्रातील मोदी सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी लागू केल्यानंतर शेतकऱ्यांनी कांदा मार्केट बंद पाडलं होतं. निर्यातबंदी लागू केल्याने कांद्याचे भाव कोसळले होते, त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. त्यातच आता दिवाळी काही दिवसांवर येवून ठेपलेली असताना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील अनेक बाजार समित्या तसेच मार्केटमध्ये कांद्याचे दर वाढले आहे. त्यामुळं यंदा शेतकऱ्यांची दिवाळी जोरदार साजरी होणार आहे. नाशिक, पुणे, संभाजीनगर आणि नागपूर येथील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव वाढल्याने बळीराजा सुखावला आहे.
राज्यातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, संभाजीनगर आणि नागपूर जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला ५०० ते ६०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी कांद्याला प्रतिक्विंटल ७०० ते ८०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने बाजार समित्या आणि मार्केटमध्ये कांद्याची विक्री करण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. नवीन लाल कांदा बाजारात येईपर्यंत मार्केटमधील कांद्याचे भाव सतत वाढत राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या उन्हाळी कांदा निघत असून या नव्या कांद्याला नाशिकच्या लासलगाव मार्केटमध्ये प्रतिक्विंटल ६०० ते ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. याशिवाय मनमाड, निफाड, नाशिक, येवला आणि चांदवड येथील मार्केटमध्येही कांद्याचे भाव सातत्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे.
उन्हाळी कांद्याचा हंगाम संपल्यानंतर लाल कांदा मार्केटमध्ये येणार आहे. याशिवाय लाल कांद्याला बाजारात मोठी मागणी असते. त्यामुळं उन्हाळी कांद्यासह लाल कांद्यालाही येत्या काळात चांगला भाव मिळणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. दिवाळीनंतर लाल कांदा मार्केटमध्ये येणार आहे. तोपर्यंत उन्हाळी कांद्याच्या भावात वाढ होत राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं पुढील महिनाभर शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळणार आहे. याशिवाय कांदा दरवाढीमुळं शहरी भागातील लोकांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या