Love Jihad Cases in Maharashtra : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लव्ह जिहादवरून राजकीय वादंग पेटलेलं असतानाच आता राज्यात एक लाखांहून अधिक लव्ह जिहादची प्रकरणं उघडकीस आल्याचा दावा शिंदे-फडणवीस सरकारकडून विधानसभेत करण्यात आला आहे. सरकारच्या दाव्यामुळं खळबळ उडाली असून त्यानंतर आता यावरून महाराष्ट्रात पुन्हा राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रसाद लोढा यांनी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना याबाबतचा खुलासा केला आहे. श्रद्धा वालकर सारखी प्रकरणं पुन्हा घडू नये, ही आमची जबाबदारी असल्याचंही मंत्री लोढा यांनी म्हटलं आहे.
विधानसभेत आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीबाबत सरकारला प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, महाराष्ट्रात एक लाखांहून अधिक लव्ह जिहादची प्रकरणं समोर आल्यामुळं कुठे ना कुठे समाज व्यथित आहे. महिलांवरील अत्याचार आणि लव्ह जिहादच्या मुद्द्यांवरून संपूर्ण राज्यभरात मोर्चे निघत आहे. दिल्लीतील श्रद्धा वालकर सारखं प्रकरण महाराष्ट्रात घडू नये, ही सरकारची जबाबदारी असल्याचंही मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.
आंतरधर्मीय विवाह कमिटीबाबत बोलण्याची माझी इच्छा नाहीये. आम्ही काढलेल्या जीआरमध्ये असा एकही शब्द नाहीये जो एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करेल. लव्ह जिहादीची प्रकरणं रोखणं ही आमची जबाबदारी असून आम्ही त्यावर काम करत असल्याचंही लोढा म्हणाले. श्रद्धा वालकरचे ३६ तुकडे करण्यात आले होते. तिला मारणारा कोण होता किंवा ती कोण होती, हा मुद्दा नाहीये. तिचा कुटुंबियांशी संपर्क तुटला होता. त्यामुळं आता तो पुन्हा प्रस्तापित करण्यासाठी आम्ही काम करत असल्याचं मंत्री मंगलप्रसाद लोढा यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या