शेतकरी आत्महत्याः सहवेदना प्रकट करण्यासाठी १९ मार्च रोजी महाराष्ट्रातील नागरिकांना अन्नत्याग करण्याची हाक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शेतकरी आत्महत्याः सहवेदना प्रकट करण्यासाठी १९ मार्च रोजी महाराष्ट्रातील नागरिकांना अन्नत्याग करण्याची हाक

शेतकरी आत्महत्याः सहवेदना प्रकट करण्यासाठी १९ मार्च रोजी महाराष्ट्रातील नागरिकांना अन्नत्याग करण्याची हाक

HT Marathi Desk HT Marathi
Updated Mar 15, 2025 11:45 AM IST

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना प्रकट करण्यासाठी येत्या १९ मार्च रोजी ‘किसानपुत्र आंदोलनाने’ राज्यातील जनतेला एका दिवसासाठी अन्नत्याग करण्याची हाक दिली आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना सहवेदना प्रकट करण्यासाठी १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना सहवेदना प्रकट करण्यासाठी १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना प्रकट करण्यासाठी येत्या १९ मार्च रोजी ‘किसानपुत्र आंदोलनाने’ राज्यातील जनतेला एका दिवसासाठी अन्नत्याग करण्याची हाक दिली आहे. संघटनेतर्फे राज्यात ठिकठिकाणी सामूहिक उपोषणाचे कार्यक्रम व सहवेदना सभा होणार असल्याची माहिती किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख अमर हबीब यांनी दिली आहे.

विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या साहेबराव करपे या शेतकरी कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येला येत्या १९ मार्च रोजी ३९ वर्षे होत आहेत. या दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु लोकसभा व विधानसभेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा साधा ठराव देखील करण्यात आला नाही. राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनाशून्य झाले आहेत, असं हबीब म्हणाले. त्यामुळे १९ मार्च हा ‘शेतकारी सहवेदना दिवस’ पाळण्यात येणार आहे. या दिवशी लोकसभा-विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून शेतकरी आत्महत्या होणार नाहीत, यासाठी उपाययोजना करावी, असे आवाहन अमर हबीब यांनी केले. हबीब यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना याबाबत एक पत्रही पाठविले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबाला दर महिना १८ हजार रुपये द्या

ज्या शेतकरी कुटुंबात शेतीबाह्य उत्पन्न येऊ लागले, त्या कुटुंबातील आत्महत्या टळल्या आहेत, असे दिसून येते, असं हबीब म्हणाले. राहिलेल्या १०-१५ टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबात शेतीबाह्य उत्पन्न कसे येईल याचा शासनाने तातडीने विचार केला पाहिजे. सरकारी वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी १८ हजार रुपये महिना ठरवले आहे. तसे १८ हजार रुपये महिन्याला या शेतकरी कुटुंबांना पोचविण्याची तरतूद सरकारने करावी. यासाठी इतर अनुदान बंद करावी लागली तर ती बंद करावी, अशी सूचना अमर हबीब यांनी केली आहे. गावो-गावच्या ग्रामपंचायती, ग्रामसभांनी 'आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धाजली' अर्पण करणारा ठराव करून महाराष्ट्र विधानसभेच्या सभापतींना पाठवावा, अशी सूचना हबीब यांनी केली आहे.

केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या घटली

केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या घटून १०-१५ टक्के राहिली आहे. तरीही तेवढ्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबावरील संकट अधिक वाढले आहे. महाराष्ट्रात दररोज ७ ते ८ आत्महत्या होत आहेत. म्हणून या वर्षी किसानपुत्रांनी १९ मार्च रोजी अन्नत्याग करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी केले आहे.

उमरा येथे करणार अन्नत्याग आंदोलन

किसानपुत्रचे नेते अमर हबीब व त्यांचे सहकारी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील उमरा या गावात १९ मार्च रोजी अन्नत्याग करणार आहेत. या गावच्या भीमराव सिरसाट या शेतकऱ्याने काही वर्षांपूर्वी तहसील कार्यालयात फाशी घेऊन आत्महत्या केली होती. या गावात दुपारनंतर सहवेदना सभा होईल, अशी माहिती अमर हबीब यांनी दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या