शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र आल्यास आनंद, आगे आगे देखिये होता है क्या: गडकरी
राज्यावर आलेले संकटाचे ढग दूर होतील, अंधार नष्ट होईल आणि सूर्य उगवेल असंही गडकरींनी म्हटलं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील राजकीय भूकंपावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सरकारवर आलेलं हे संकट लवकरच दूर होईल असं भाष्य गडकरींनी केलं आहे. राज्यात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास आनंद होईल असं म्हणत आगे आगे देखो होता है क्या असंही गडकरींनी म्हटलं.
गडकरी यांना राज्यातील राजकीय गदारोळाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, आजच्या समस्येत उद्याची उत्तरं दडलेली असतात. सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील. राज्यावर आलेले संकटाचे ढग दूर होतील, अंधार नष्ट होईल आणि सूर्य उगवेल. मुख्यमंत्री ठाकरेंवर घोंगावणारे ढग दूर होतील असंही गडकरींनी म्हटलं.
उद्धव ठाकरे यांच्याशी तुमचे जवळचे संबंध असल्याचं मानलं जातं याबद्दल विचारलं असता गडकरींनी म्हटलं की, "वैयक्तिक नाती, संबंध हे राजकीय संबंधांपेक्षा वेगळे असतात. ते सरकारमध्ये असोत किंवा नसोत तरी ते संबंध असतात."
दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करत त्यांनी म्हटलं की, "सरकार येतं, जातं, पक्ष तयार होतात आणि संपतात पण देश हाच असतो. सर्वांना देशासाठी काम करायचं असतं असं वाजपेयी म्हणाले होते. भारताला महाशक्ती बनवण्यासाठी काम करायचे आहे आणि आपण चालत रहायला हवं हा निसर्गाचा नियम असल्याचंही त्यांनी सांगितल्याचं", गडकरी म्हणाले.
राज्यात शिवसेनेत सुरू असलेल्या बंडखोरीमागे भाजप असल्याचा आरोप होतोय. त्याबाबत गडकरींना विचारले असता त्यांनी सांगितले की, "मी राज्यातल्या राजकारणावर जास्त बोलणार नाही. पण एवढं नक्की सांगेन की शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर माझ्यासारख्या व्यक्तीला आनंदच होईल."
संबंधित बातम्या