भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी तडकाफडकी राजकीय निवृत्ती जाहीर केल्यानंतर भाजपच्या गोटात वेगवान घडामोडी घडल्या आहेत. भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या मतभेदातून निलेश राणे यांनी सक्रीय राजकारण सोडल्याची चर्चा होती. त्यामुळे आज रवींद्र चव्हाण यांनी स्वत: निलेश राणे यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर दोघे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी रवाना झाले.
निलेश राणे यांनी तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि राणे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आले होते. मात्र आज निलेश राणेंची मनधरणी करण्यात भाजपला यश आले. आज सकाळी रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणेंची भेट घेतली. त्यानंतर हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहचले. या बैठकीत निलेश राणेंच्या नाराजीचं कारण अखेर समोर आले. यावर बैठकीत तोडगा काढून पुढील काळात कोकणात निलेश राणेंच्या नेतृत्वात भाजपचा झंझावात सुरू राहणार असल्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं.
फडणवीसांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, खरंतर निलेश राणेंनी ट्विट केल्यानंतर आमच्यासारख्या प्रत्येकाला सर्व गोष्टींबद्दल नक्की काय घडलं हे कळत नव्हतं. परंतु त्यानंतर आम्ही नारायण राणेंशी चर्चा केली, नारायण राणेंनीही निलेश राणेंशी बोलत काय घडलंय याची चर्चा केली. त्यानंतर आज सकाळी मी प्रत्यक्ष जाऊन चर्चा केली.
संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येकाला नेहमीच वाटत असतं की, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये. छोट्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये यासाठी निलेश राणेंनी भूमिका घेतली होती. जेव्हा छोटा कार्यकर्ता काम करत असतो, त्यावेळी त्याला येणाऱ्या अडचणी नेत्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत असं निलेश राणेंची मागणी होती असं त्यांनी सांगितले.
छोट्या कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात असं त्याचं म्हणणं होतं. याबाबत आम्ही चर्चा केली. निलेश राणे यांनी रागावून निर्णय घेतला होता. आता मी स्वतः या विषयात लक्ष घालणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची कामे केली जातील. मी आग्रह केला असा निर्णय घेऊ नका. ज्या अडचणी आहेत त्या समजून घेऊ.
आम्ही सर्वजण पक्षासाठी काम करत आहोत. लोकसभा विधानसभा निवडणुका लढत असताना कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण येऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे, असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
संबंधित बातम्या