Sharad Pawar : 'मी तिकीट देतो असं सांगितल्यानं सुशीलकुमार शिंदेंनी नोकरी सोडली, पण...
Sharad Pawar on Sushil kumar Shinde : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या मैत्रीचे जुने किस्से सांगितले.
पुणे : सुशीलकुमार शिंदे यांनी माझ्या सांगण्यावरुन पोलीस खात्यातील नोकरी सोडली. मी त्यांना पोटनिवडणुकीत आमदारकीचे तिकीट मिळवून देतो असे आश्वासन दिले होते. पण मी त्यांना तिकीट मिळवून देऊ शकलो नाही. त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आले, असा खास किस्सा आज राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितला. पवार म्हणाले, मी त्या सरकारमध्ये गृहमंत्री झालो. शिंदे कायद्याचे पदवीधर असल्याने मी त्यांना सरकारी वकील बनवले. आपल्या ज्या काही केसेस असतील तर त्या शिंदेंना द्यायचे ठरले. पुढे त्यापुढील निवडणुकीत शिंदेंना तिकीट मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यानंतर त्यांनी मागे बघून पाहिल नाही, असंही शरद पवार म्हणाले.
पुणे नवरात्र मोहत्सव आयोजित कार्यक्रमात ते शरद पवार बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री विश्वजित कदम, उल्हास पवार, आबा बागुल, जयश्री बागुल, ॲड प्रताप परदेशी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी महर्षी पुरस्कार सुशीलकुमार शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला.
पवार म्हणाले, पुणे शहरात अनेक पुरस्कार दरवर्षी दिले जातात. देशात एखाद्या शहरात सर्वाधिक पुरस्कार हे केवळ पुणे शहरात दिले जातात. सुशीलकुमार शिंदे यांचे सार्वजनिक जीवनातील आयुष्य संघर्षात गेले आहे. शून्यातून त्यांनी कामाला सुरवात केली आणि मोठे काम निर्माण केले. त्यांना अनेकवेळा मी नोकरी सोडून द्या सांगितले आणि राजकारणात या म्हणालो. त्याप्रमाणे त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला पक्षाने त्यांना तिकीट द्यावे असा आग्रह मी पक्ष नेतृत्वाकडे धरला. स्वतःच्या कर्तुत्वाने त्यांनी पुढे निवडणूक लढवल्या आणि वेगवेगळी पदे भूषवत ते जीवनात यशस्वी झाले.
शिंदे म्हणाले, मी वयाच्या ८० व्या वर्षापासून पुरस्कार घेणे बंद केले परंतु पवार यांच्या हस्ते पुरस्कार म्हणून मी आलो. कारण, पवार यांनी मला राजकारणात आणले आहे. महाराष्ट्राचे पवार आकर्षण असून ते माझे ही आकर्षण आहे. मी राजकारण मध्ये येताना त्यांनी मला धीर दिला. यशवंतराव चव्हाण यांना भेटून त्यांनी मला राजकारणात आणण्याचे सांगितले आणि घेऊन आले. यशवंतराव चव्हाण यांचे कार्य चिरंतन ठेवण्यासाठी त्यांनी मुंबईत केंद्र उभारणी केली आहे. समाजातील छोटी माणसे मोठी करण्याचे काम पवार यांनी करत राज्यात अशाप्रकारे अनेक नेते तयार केले. तिकीट देवून लोकांना निवडून आणण्याचे काम त्यांनी केले. मला १९७१ मध्ये माझ्या निवडणुकीस १६ हजार रुपये खर्च आला आणि पवार यांनीच त्यासाठी पैसे दिले. मला सातत्याने सोबत घेऊन ते राज्यभर फिरत होते त्यातून अनेक गोष्टी मला शिकण्यास मिळाले. राजकारणातील डावपेच ही मी त्यांच्याकडून शिकलो. काँगेस पक्षास आव्हान देवून पवार एक वैचारिक भूमिका घेऊन वेगळे झाले आणि मुख्यमंत्री झाले आणि देशाला त्यांचे नेतृत्व दिसून आले. आज देशात ज्या प्रकारे फिरतात आणि देश एकसंध व सर्वधर्म समभाव व्हावा यासाठी फिरतात ते प्रेरणादायी आहे, असे देखील शिंदे म्हणाले.
संबंधित बातम्या