Maharashtra Politics : आमदार अस्वस्थ अन् बॉडी लँग्वेज पडलेली, ही कोणत्या भूकंपाची चिन्हं असावीत?
Maharashtra Politics Crisis : सत्ताधारी आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती, ही कोणत्या भूकंपाची चिन्हे असावीत, असा सवाल रोहित पवार यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या याचिकांवर गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच अद्यापही सुटलेला नाही. दोन दिवसांच्या सुनावणीतही सर्वोच्च न्यायालयात याबाबत निकाल अद्याप लागलेला नाही.पहिल्या दिवशी ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केल्यानंतर आज शिंदे गटाच्या वतीनेही हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला.
ट्रेंडिंग न्यूज
त्यानंतर हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार? यावर आज निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, न्यायालयाचे कामकाज संपल्याने या प्रकरणी आता उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान याया घटनाक्रमावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे.
रोहित पवार यांनी ट्विट केले आहे की, भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचे वर्तन बदलत असते. एक प्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते. असेच एक वेगळ्या प्रकारचे माझे निरीक्षण आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती. सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचे समजले. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचे समजले. ही कोणत्या भूकंपाची चिन्हे असावीत? अशी विचारणा रोहित पवार यांनी केली आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्याबाबत रोहित पवार म्हणाले की, भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग सहावं नसून ते आसाममध्ये असल्याचा अजब दावा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलाय. त्यामुळं राज्यात बदला घेण्याचा कट आखण्यासाठी गुवाहाटीला जाऊन आसामच्या मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार घेणारे या दाव्याचा कसा ‘बदला’ घेतात, याची महाराष्ट्र वाट पाहतोय, असं रोहित पवार म्हणाले आहेत.