मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विश्वासघात तुम्ही करता, खापर दुसऱ्यावर फोडता?; राष्ट्रवादीने कदमांना झापले

विश्वासघात तुम्ही करता, खापर दुसऱ्यावर फोडता?; राष्ट्रवादीने कदमांना झापले

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jul 19, 2022 03:23 PM IST

NCP On Ramdas Kadam: "शरद पवार आणि अजित पवारांनी शिवसेना फोडली. पवारांनी बरोबर डाव साधला." असा आरोप रामदास कदम यांनी केला होता.

राष्ट्रवादीने रामदास कदमांना झापले
राष्ट्रवादीने रामदास कदमांना झापले (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

NCP On Ramdas Kadam: शिवसेनेच्या (Shivsena) नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम (Ramdas Kadam) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर अनेक आरोप केले. आता या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर दिले आहे. बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडली. मातोश्रीला दगाफटका केला, ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आणि स्वतःच्या कृतीला योग्य आहे हे दाखविण्यासाठी त्याचे खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर मारण्याचा हा केविलवाणा प्रयत्न रामदास कदम व काही बंडखोर नेत्यांकडून सुरु असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने पलटवार केला आहे.

"शरद पवार यांनी शिवसेना फोडली. अजित पवार यांनी प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. शरद पवार आणि अजित पवारांनी शिवसेना फोडली. पवारांनी बरोबर डाव साधला." असा आरोप रामदास कदम यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं की, "२०१९ मध्ये पवारसाहेबांनी राष्ट्रवादी - शिवसेना - कॉंग्रेस या तीन पक्षांची मोट बांधली. तेव्हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. देशाच्या पाच टॉप मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचे नाव आले आहे. त्यामुळे शिवसेनेचे बंडखोर उद्धव ठाकरे यांना सोडून जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे."

शिंदे गटाने शिवसेना फोडली याचे खरे सूत्रधार भाजप आहे. २०१९ मधील जो राग आहे त्यातून हे षडयंत्र सुरू आहे. पोलीस बळ आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आमदार खासदार यांना भयभीत केले गेले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे कसे चुकले हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. मात्र राज्यातील जनता व शिवसैनिक ज्यांना निवडून दिले त्यांनी मातोश्रीशी कशी गद्दारी केली हे पहात आहे असेही महेश तपासे म्हणाले.

बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे हे आमची शिवसेना खरी असल्याचा दावा करत आहेत. त्यावरून प्रश्न विचारताना महेश तपासे यांनी म्हटलं की, "आज शिवसेना फोडून शिंदे आपली शिवसेना खरी आहे हे सांगत आहेत मग इतकी वर्षे मातोश्रीचं, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची मेहनत, उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची शिवसेना वाढीची मेहनत काहीच नाही का?"

शिवसेनेवर थेट टीका करण्याचं टाळून राष्ट्रवादीवर तोंडसुख घेत असल्याचा आरोही तपासे यांनी बंडखोर शिंदे गटावर केला आहे. त्यांनी म्हटलं की,"शिवसेना बंडखोर आमदारांनी जी कृती केली आहे ती कृती महाराष्ट्रातील जनतेच्या पचनी पडलेली नाही. उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी निष्ठावान सामान्य शिवसैनिक असल्याने त्यांच्यावर थेट टीका न करता राष्ट्रवादीवर तोंडसुख घेण्याचे काम बंडखोर शिंदे गट करत आहे."

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आणि राज्यात सत्तांतरानंतर आता पुढच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र दिसेल असे संकेत महेश तपासे यांनी दिले आहेत. ते म्हणाले की,"आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, लोकसभा, विधानसभा यामध्ये महाविकास आघाडी एकत्रित प्रचार करेल व बंडखोरांना व रिमोट कंट्रोल चालवणार्‍या भाजपचा पराभव होईल ही भीतीही निर्माण झाली आहे."

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या