Hasan Mushrif : आम्हाला अजून किती त्रास देणार, गोळ्या मारून संपवून टाका; मुश्रीफांच्या पत्नीचा टाहो
ED Raid at Hasan Mushrif Residence: राष्ट्रवादी काँग्रेसचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ सध्या ईडीच्या रडारवर असून ईडीची पथकाने पुन्हा त्यांच्या घरावर धाड टाकली आहे. ईडीच्या चार ते पाच अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी तपासणी करत आहे. या कारवाईमुळे त्यांचे कार्यकर्ते ही संतप्त झाले असून त्यांच्या पत्नीने देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणी या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. ईडीची वक्रदृष्टी सध्या हसन मुश्रीफ यांच्यावर आहे. आज पुन्हा ईडीच्या पथकाने त्यांच्या घरावर धाड टाकली आहे. दोन महिन्यातील ही तिसरी कारवाई आहे. ईडीचे चार ते पाच वरिष्ठ अधिकारी ही त्यांच्या घरी चौकशी करत आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ही संतप्त झाले आहेत. हसन मुश्रीफ कागलमध्ये येणार हे माहीत असल्याने त्यांचे समर्थक तसेच कार्यकर्ते त्यांच्या समस्या घेऊन निवासस्थानी जमा झाले होते. त्यांना ईडी कारवाई सुरु असल्याचे समजताच त्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजीला सुरुवात केली. तसेच धरणे आंदोनल केले. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. दरम्यान, सतत होणाऱ्या या कारवाई विरोधात मुश्रीफ यांच्या पत्नी यांनी देखील उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी शनिवारी पहाटेच्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यावर कार्यकर्ते आक्रमक झाले. ईडी आणि भाजप सरकारविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी हसन मुश्रीफ यांच्या पत्नी मध्यमांशी बोलतांना भावुक झाल्या होत्या. यावेळी त्यांनी सरकारवर टीका करत संतप्त भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, किती वेळा यायचे या ठिकाणी? आम्हाला किती त्रास द्यायचा काही आहे की नाही? गेल्या काही दिवसांपासून रोज उठून तेच तेच सुरू आहे. साहेब काम करणारा माणूस आहे. रात्रंदिवस जनतेसाठी ते राबतात आणि हे सरकार असं का करत आहे? आम्ही करायचं तरी काय, यांना आणि आम्हाला एकदाच गोळ्या घालून ठार करायला सांगा.
मुश्रीफ यांच्यावरील कारवाईचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. कागल येथे त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात नागरिक घोषणाबाजी करत आहेत. आम्हाला गोळ्या घाला मात्र साहेबाना विनाकारण यात अडकवले जात आहे, असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्स प्रकरण, आप्पासाहेब पाटील साखर कारखाना ब्रिक्स कंपनीनं चालवायला घेतला होता. याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आरोप केला होता.या प्रकरणात मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, ईडीने या आधी सुद्धा त्यांचावर कारवाई केली होती. आता आज पुन्हा कारवाई करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
विभाग