'ब्रिटिशांना मुंबई आवडली, आता अदानींनाही आवडते', भुजबळांकडून कोश्यारींचा समाचार
Chhagan Bhujbal On Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे.
Bhagat Singh Koshyari Controversial Statement On Mumbai : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून अनेक नेत्यांनी त्यांच्याविरोधात टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपालांवर जोरदार टीका केली असून सत्ताधारी शिंदेगट राज्यपालांची केंद्रात तक्रार करणार असल्याची माहिती आहे.
परंतु आता राज्यपालांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत ब्रिटिशांना मुंबई आवडत होती, आता अदानींनाही आवडते, असा टोला राष्ट्रवादीचे नेते छनग भुजबळांनी राज्यपालांना लगावला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं वागणं निर्विवाद असायला हवं, ते आमचे मित्र आहेत, पण त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणं टाळायला हवं, असं भुजबळ म्हणाले आहेत, मुंबईत बंदरं, व्यापार, उद्योग किंवा विमानतळं आहेत, अनेक कलाकार मुंबईतच राहतात, गुजराती, राजस्थानी सगळे आमचेच आहेत, देशाचे सरन्यायाधिशही महाराष्ट्राचेच असल्यानं मुंबईचं महत्त्व कसं कमी करता येईल?, असा सवाल छगन भुजबळांनी राज्यपालांना विचारला आहे.
दरम्यान आता राज्यपालांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोपाचा फैरी सुरू झाल्या आहेत. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यपालांवरील टीकेनंतर आता भाजप आमदार नितेश राणे आणि शिंदेगटाचे नेते रामदास कदम यांनी राज्यपालांच्या वक्तव्याची पाठराखण केली आहे.
संबंधित बातम्या