बेळगाव, कारवार, निपाणी सोडणार असाल तर...; बोम्मईंच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया
बोम्मईंच्या विधानावरून शरद पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केलीय. दोन्ही राज्यात भाजपचे राज्य आहे आणि हे सगळं घडतंय त्याला भाजपच जबाबदार आहे असं पवार म्हणाले.
suraकर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातल्या जत तालुक्यातील काही गावांबाबत केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा आहे. यामुळे राजकीय नेत्यांनी उलटसुलट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही गाव महाराष्ट्रातून जाणार नाही असं म्हटलं होतं. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं की, ते बेळगाव, कारवार, निपाणी सोडणार असतील तर त्याना काय द्यायचं यावर चर्चा होऊ शकते.
शरद पवार यांनी म्हटलं की, जी काही विधाने बोम्मई यांनी केली आणि मागणी केलीय. त्यात काही गावांवर क्लेम केलाय. हा क्लेम अनेक वर्षांपासून आम्ही करतोय. बेळगाव, कारवार मागतोय. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी या सगळ्यासह जी महाराष्ट्राची मागणी आहे त्यात सातत्य आहे. आज तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काही गावं हवी आहेत. पण बेळगाव, कारवार, निपाणी हे ते सोडणार असतील तर काय त्यांना द्यायचं याची चर्चा होऊ शकते. मात्र काही न करता कशाची तरी मागणी करणं हे शहाणपणाचं लक्षण नाही.
बोम्मईंच्या विधानावरून शरद पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केलीय. दोन्ही राज्यात भाजपचे राज्य आहे आणि हे सगळं घडतंय त्याला भाजपच जबाबदार आहे असं पवार म्हणाले. त्यांनी म्हटलं की, आता कर्नाटकात भाजपचं राज्य आहे, तर इथं महाराष्ट्रात भाजपच्या पाठिंब्याचं राज्य आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलाय. काहीही मागण्या करतायत. हे सगळं घडतंय त्याला जसे ते जबाबदार आहेत तसं केंद्रातील सत्तेत असलेलं भाजपही जबाबदार आहे.