
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात २५ कोटींची मागणी केल्याच्या आरोपाप्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू असतानाच समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी करण सजनानी यांनी मोठा गौप्यस्फोट करत म्हटले आहे की, समीर वानखेडे आणि आशिष रंजन यांनी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात कटकारस्थान रचण्यासाठी आपल्याला आरोपी बनण्यास सांगितलं होत. सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात आरोपी बनल्यास तुला लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढू, असं आश्वासनही समीर वानखेडेंनी दिल्याचं सजनानी यांनी म्हटलं आहे.
एनसीबीचे माजी विभागीय प्रमुख समीर वानखेडे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांच्या मुंबईतील निवासस्थानासह अन्य ठिकाणी छापेमारी करण्यात आली. आर्यन खान अटकप्रकरणी समीर वानखेडे यांनी २५ कोटींची लाच मागितली, असा आरोप सीबीआयने केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून समीर वानखेडे यांची याबाबत उद्या (१८ मे) दिल्लीत सीबीआय मुख्यालयात चौकशी होणार आहे.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आरोप करताना करण सजनानी म्हणाले की, एनसीबीचे अधिकारी आशिष रंजन आणि समीर वानखेडे यांनी म्हटलं होतं की, तुमच्यावर २०० किलो ड्रग्ज प्रकरणात कारवाई करत आहोत. पण दोन आठवड्यानंतर तुम्हाला पुन्हा यावं लागेल आणि सुशांतसिंह प्रकरणात आरोपी बनावं लागेल.
समीर वानखेडे यांना सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कट रचण्यासाठी ३० हून अधिक लोकांची गरज होती. त्यामुळे त्यांनी मला म्हटलं की, तुम्ही आम्हाला मदत करा. याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढू, मात्र मी सुशांतसिंहला ओळखतही नव्हतो. समीर वानखेडे असं का करत होते? ते मला माहीत नव्हतं असं सजनानी म्हणाले आहेत.
संबंधित बातम्या
