दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ होत असून वर्षभराच्या काळात नवी मुंबईतील नागरिकांना तब्बल ४४० कोटी रुपये गमवावे लागले आहे. नवी मुंबई पोलिसांनी २०२४ या वर्षभरातील गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार नवी मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये १५० कोटी ९७ लाख रुपयांची नागरिकांची सायबर फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ४१ कोटी ३२ लाख रुपये गोठविण्यात आले असून ६ कोटी ९२ लाख रुपये वसूल करून तक्रारदारांना परत करण्यात पोलिसांना यश आले आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म (एनसीसीआरपी) पोर्टलवर २९६.७१ कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी २७.५३ कोटी रुपये गोठविण्यात आले आहेत.
सायबर फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेणे ही तशी वेळखाऊ प्रक्रिया असते. फसवणूक करणारे दुसऱ्या अधिकार क्षेत्रातील असल्या कारणामुळे तपासात मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन फसवणुकीला बळी पडू नये यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती नवी मुंबईचे सहाय्यक पोलिस आयुक्त अमित काळे यांनी दिली.
२०२४ या वर्षभरात नवी मुंबई पोलिसांना सायबर गुन्ह्यांशी संबंधित ४३६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ७९ गुन्ह्यांची उकल झाली. २०२३ मध्ये ७६ गुन्ह्यांची उकल झाली होती. एनसीसीआरपीवर सायबर क्राइमच्या १३,५९७ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. एकंदरीत, २०२४ मध्ये दाखल झालेल्या सायबर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये किरकोळ घट झाली असली तरी एकूण पोलिस प्रकरणांची संख्या १०.७ टक्क्यांनी वाढली आहे.
२०२४ मध्ये दाखल झालेल्या ७,३६९ गुन्ह्यांपैकी पोलिसांनी ५,६७७ म्हणजे ७७ टक्के गुन्ह्यांचा छडा लावला आहे. २०२३ मध्ये हे प्रमाण ७४ टक्के एवढे होते. २०२४ मध्ये सायबर गुन्ह्यामध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण ४५ टक्क्यापर्यंत पोहचले आहे. २०२३ मध्ये हे प्रमाण ३६ टक्के होते. तपास कार्यात वैज्ञानिक मदतीने पुरावे गोळा करणे, जबाब नोंदविण्यासाठी ‘यथार्थ’ या नव्या सिस्टिमचा वापर, ई-समन्स आणि फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटचे (एफआययू) काम आदी कारणांमुळे दोषी ठरण्याचे प्रमाण वाढले असल्याचे आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले.
नवी मुंबईत २०२४ मध्ये महिलांवरील गुन्ह्यांमध्येही घट झाल्याचे दिसून आले आहे. २०२३ मध्ये ७३० वरून २०२४ मध्ये ६२६ पर्यंत घट झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बलात्काराच्या घटनांमध्ये घट झाली आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये २०२३ मध्ये २३३ वरून २०२४ मध्ये १८० पर्यंत घट झाली आहे. छळाची प्रकरणेही २०२३ मधील २१२ वरून गेल्या वर्षी १५२ वर आली आहेत. हा शहरातील सकारात्मक कल असल्याचे काळे यांनी सांगितले.
संबंधित बातम्या