Navi Mumbai Murder and Suicide News: नवी मुंबईच्या कळंबोली येथून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह खारघर येथील टेकडी परिसरात आढळून आला. या तरुणीची गळा आवळून हत्या झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर आले. महिन्याभरानंतर या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला. संबंधित तरुणीच्या प्रियकराने तिची हत्या करून स्वत: रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची पोलीस चौकशीत उघड झाले. दरम्यान, ५ वर्षाच्या प्रेमसंबंधात गेल्या काही महिन्यापासून दुरावा निर्माण झाल्याने प्रियकराने तरुणीची हत्या केल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी मनोहर बाबर (वय, १९) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. वैष्णवी ही तिच्या कुटुबांसोबत कळंबोली येथील सेक्टर-१ मध्ये वास्तव्यास होती. तसेच सायन येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिचे वैभव बुरुंगले (वय, २४) याच्याशी गेल्या ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. यानंतर वैभवने वैष्णवीची हत्येचा कट रचला.
दरम्यान,१२ डिसेंबर २०२३ रोजी वैभव तिला घेऊन खारघर येथील टेकडीवरील दुर्गम झुडपात घेऊन गेला. तिथे त्याने तिचा गळा आवळून हत्या केली. यानंतर वैभवने ही जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ लोकलसमोर उडी घेत स्वत:चे आयुष्य संपवले. आत्महत्यापूर्वी वैभवने त्याच्या मोबाईलमध्ये सुसाइड नोट लिहिली होती, ज्यात त्याने वैष्णवीच्या हत्येची माहिती दिली.
ज्या ठिकाणी वैभवने वैष्णवीचा हत्या केली होती. त्या ठिकाणावरील झाडांचा क्रमांक वैभवने आपल्या सुसाइड नोटमध्ये लिहिला होता. पोलिसांनी वन विभागाच्या मदतीने झाडाचा शोध घेतला असता वैष्णवीचा मृतदेह कुजलेला अवस्थेत सापडला. १० दिवसानंतर वैष्णवीच्या मृतदेहाचा शोध लागला.
संबंधित बातम्या