Panvel Students Rescued News: पनवेलमधील असई गावातील डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या ९ विद्यार्थ्यांची खांदेश्वर पोलीस आणि पनवेल अग्निशमन दलाच्या पथकाने सुखरूप सुटका केली.मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व विद्यार्थी १६ ते २० वयोगटातील आहे. यातील सहा विद्यार्थी पनवेल आणि इतर तीन विद्यार्थी आदई गवातील रहिवाशी आहे. त्यांनी गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ट्रेकिंगला सुरुवात केली. मात्र, खाली उतरताना अडचण येऊ लागल्याने त्यांनी ११२ क्रमांकावर फोन केला आणि सद्यपरिस्थितीबाबत माहिती दिली.
आम्हाला नियंत्रण कक्षाकडून ट्रेकिंगसाठी गेलेले काही विद्यार्थी आदई गावातील डोंगरावर अडकल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना लोकेशन शेअर करण्यास सांगितले. याबाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. हा रस्ता धोकादायक नव्हता. परंतु, पावसामुळे निसरडा झाला होता. त्यामुळे विद्यार्थी घाबरले.पाऊस पडला नसता तर ते सहज खाली येऊ शकले असते, अशी माहिती खांदेश्वर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी दिली.
अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्हाला गुरुवारी सकाळी ९.४२ वाजता पनवेल पोलिसांचा फोन आला. त्यानंतर डोंगरावर अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या बचावासाठी ६ जणांची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर अग्निशमन दलातील जवानाने धबधब्यावर चढून विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती दिली. रस्ता निसरडा झाल्याने त्यांना खाली उतरता आले नाही. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे खाली आणण्यात आले. बचावकार्य ११.४६ मिनिटांनी पूर्ण झाले."
पावसाळा सुरु झाला की, बरसणाऱ्या धारांचा, निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायची स्वाभाविकच इच्छा निर्माण होते. पण अशावेळी पर्यटनाचा आनंद घेण्यासोबतच काही काळजी बाळगणेही गरजेचे आहे. ट्रेकिंगला जाताना कोणती काळजी घेतली पाहिजे, हे जाणून घेऊयात. पावसळ्यात धुक्यामुळे वाट चुकण्याची शक्यता असते. ट्रेकमध्ये फर्स्ट मॅन आणि लास्ट मॅन यांच्या मध्येच चालावे. किल्ल्यांवरील तट, दरवाजे, इतर पडीक अवशेषांवर चढू नये, एखादा सुटलेला दगड निसटून अपघात होऊ शकतो. निसरड्या रस्त्यावरून जपून चालावे. धोकादायक ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेणे टाळावे.
संबंधित बातम्या