Manoj Jarange Patil on Maratha Reservation : बीडमधील नारायणगडावर मराठा समाजाचा भव्य दसरा मेळावा आज पार पडला. मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी या मेळाव्याला संबोधित केलं. 'मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यास विरोध करणाऱ्यांवर जरांगे यांनी यावेळी नाव न घेता तोफ डागली.
मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी आरक्षण प्रवर्गात समावेश करावा, अशी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनाची मागणी आहे. त्यासाठी गेल्या १४ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारनं आश्वासन देऊनही ते पूर्ण न केल्यानं मराठा समाजात रोष आहे.
मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण दिल्यास आमच्या आरक्षणास धक्का लागेल, असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे. छगन भुजबळ यांनी ही भूमिका हिरीरीनं मांडली आहे. त्यावरून जरांगे व भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमकीही झडल्या होत्या. मात्र, दोनच दिवसांपूर्वी आणखी १५ मागास जातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनुसार हा निर्णय झाला आहे. त्यावरून जरांगे पाटील यांनी नाव न घेता छगन भुजबळ व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली.
‘मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तर आमच्या आरक्षणाला धक्का बसेल, असं काही लोक म्हणत होते. काल-परवा आणखी १५ जाती ओबीसींमध्ये घेतल्या गेल्या. तेव्हा तुमच्या आरक्षणाला धक्का बसला नाही का? धक्का बसेल म्हणणारा आता कुठं आहे?,’ असा टोला जरांगे यांनी भुजबळांना हाणला.
एका चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं होतं. सत्तेत आल्यास आम्ही आरक्षण देऊ असं महाविकास आघाडी आम्हाला लिहून द्यावं असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा मनोज जरांगे यांनी समाचार घेतला. आरक्षणावर निर्णय घ्यायची वेळ आली की विरोधी पक्षाला मध्ये आणतायत. मराठ्यांना ओबीसीमध्ये घालण्यासाठी ह्यांना लिहून पाहिजे. मग १५ जाती ओबीसीमध्ये घालताना महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं होतं का, असा सवाल जरांगे यांनी फडणवीसांना केला.
संबंधित बातम्या