मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nana Patole: 'महाराष्ट्राचा पैसा गुजरातला देण्याचा खटाटोप सुरू आहे, हे खपवून घेणार नाही'

Nana Patole: 'महाराष्ट्राचा पैसा गुजरातला देण्याचा खटाटोप सुरू आहे, हे खपवून घेणार नाही'

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 11, 2022 05:46 PM IST

Nana Patole on Shinde Government: आझादी गौरव यात्रेच्या निमित्तानं औरंगाबादमध्ये असलेले काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Eknath Shinde- Devendra Fadnavis-Narendra Modi
Eknath Shinde- Devendra Fadnavis-Narendra Modi

‘राज्यात आता सत्तेवर आलेले सरकार हे शेतकरी विरोधी आहे. महाराष्ट्राचा पैसा गुजरातला कसा देता येईल यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही. अतिवृष्टग्रस्तांना भरीव मदत द्या अन्यथा पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही,’ असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित आझादी गौरव पदयात्रेदरम्यान नाना पटोले औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. पटोले यांनी यावेळी राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. 'राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना शिंदे-फडणवीस सरकारनं जाहीर केलेली मदत दिलासा देणारी नाही तर तुटपुंजी आहे. एनडीआरएफचे निकष जुने आहेत, त्यामुळं दुप्पट नाही तर त्यापेक्षा जास्त मदत देणं गरजेचं आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारी व थट्टा करणारी आहे. महाविकास आघाडी सरकार असताना अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्यांना १५ हजार रुपयांची मदत देण्यात आली होती, पण ती मदत अपुरी आहे म्हणून आत्ता सत्तेत असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती मग आता जाहीर केलेली मदत दिलासा देणारी कशी? आम्ही हेक्टरी ७५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती, सरकारनं फक्त १३ हजार रुपये जाहीर केले आहेत, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. मदत देताना ३ हेक्टरची मर्यादा घातली आहे, ती सुद्धा अन्यायकारक असून ही मर्यादा काढून टाकावी, अशी मागणी पटोले यांनी केली.

'शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली गेली पाहिजे तसेच घरांची पडझड, छोटे दुकानदार, टपरीवाले यांना किती मदत देणार हे स्पष्ट केलेलं नाही. महाविकास आघाडीचं सरकार असताना अतिवृष्टी व मुसळधार पावसानं नुकसान होताच तातडीनं १० हजार रुपयांची रोख मदत जाहीर केली होती व नंतर पॅकेजही दिलं होतं, पण भाजप शिवसेनेचं हे सरकार शेतकऱ्यांना मदतीच्या नावावर लॉलीपॉप दाखवून वाऱ्यावर सोडत आहे, असा संताप पटोले यांनी व्यक्त केला.

IPL_Entry_Point