Nagpur Rain : नागपुरात पावसाचा कहर! विमानतळाचे प्रवेशद्वार पाण्याखाली, रस्त्यांना नद्यांचे रुप
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Rain : नागपुरात पावसाचा कहर! विमानतळाचे प्रवेशद्वार पाण्याखाली, रस्त्यांना नद्यांचे रुप

Nagpur Rain : नागपुरात पावसाचा कहर! विमानतळाचे प्रवेशद्वार पाण्याखाली, रस्त्यांना नद्यांचे रुप

Published Jul 20, 2024 06:19 PM IST

Nagpur rain :नागपूर विमानतळाचे प्रवेशद्वार पाण्याखाली गेले असून विमानतळासमोरील ५०० मीटर परिसरात पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. विमानतळासमोर पावसाने तळे साचले आहे.

नागपूर विमानतळाचे प्रवेशद्वार पाण्याखाली
नागपूर विमानतळाचे प्रवेशद्वार पाण्याखाली

नागपुरात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक घरात पाणी शिरले आहे.  पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. नागपूर विमानतळाचे प्रवेशद्वार पाण्याखाली गेले असून विमानतळासमोरील ५०० मीटर परिसरात पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. विमानतळासमोर पावसाने तळे साचले असल्याने विमानतळातून प्रवाशांना बाहेर पडता येत नाही. त्याचबरोबर पोलिसांनी विमानतळाकडे जाणारा रस्ता  बॅरिकेट टाकून बंद केल्याने विमानतळापर्यंत पोहोचणेही प्रवाशांना मुश्किल झाले आहे.

विमानतळासमोरील नागपूर वर्धा रस्त्याला नदीचे रुप आले आहे. येथे पावसाने कंबरेइतके पाणी साचले आहे. प्रशासनाकडून योग्य नियोजन नसल्याने विमानतळाचे प्रवेशद्वार दरवर्षी पाण्याखाली जात असल्याचा आरोप नागिरकांना केला आहे. पावसाचा जोर पाहून नागपुरातील शाळा- महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. काही तासातच नागपुरात ९१.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रात्रीपासूनच शहरात पावसाला सुरुवात झाली. ४ वाजताच्या सुमारास पावसाची तीव्रता वाढली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. शहरातील नरेंद्र नगर, भांडेवाडी, शिवशक्ती नगर, पिवळी नदी, मानकापूर येथील वस्त्यांचा समावेश आहे. काही घरांतदेखील पाणी शिरले आहे.

नागपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून स्वतः जिल्हाधिकारी शहराचा दौरा करीत आहेत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

त्यांनी म्हटले की, शहरातील शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली असून ज्या सखल भागात पाणी शिरले तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. काही परिसरात काही रस्ते बंद झाले आहेत. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश देण्यात आले असल्याचे फडणवीस म्हणाले.

नागपूरमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. काल रात्रीपासून पावसाने कहर केला असून नागपूर पुन्हा एकदा पाण्यात गेले आहे. नागपूरजवळील पिपळा गावाला पावसाच्या पाण्याने वेढा दिला असून  गावातील ४ हजार नागरिक अडकून पडले आहेत. सर्व घरात व दुकानात पाणी शिरले आहे. 

शहरातील वीज पुरवठाही खंडीत -

शनिवारी पहाटेपासून विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला आहे. शहरातील काही भागात झाडाच्या फांद्या तारांवर पडल्याने काही भागात वीज यंत्रणेत तांत्रिक दोष निर्माण झाला आला. शहरातील बऱ्याच भागात वीज पुरवठा सुरू- बंद होत असल्याचे चित्र आहे. महावितरणच्या बेसा परिसरातील सुतगिरणी उपकेंद्रामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने ३३ केव्हीचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे येथील अनेक भागातील हजारो ग्राहकांचा वीज पुरवठा ठप्प आहे. 

दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातही येत्या ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर