Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वरील प्रवास महागणार, असे असतील टोलचे नवे दर
Mumbai-Pune Expressway Toll Rate hike : मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरील प्रवास आता महागणार आहे. या मार्गावरील टोल दरात तब्बल १८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
मुंबई : पुणे आणि मुंबईला जोडणारा एक्सप्रेसवे हा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गाने हजारो प्रवाशी रोज प्रवास करत असतात. मुंबई पुणेकरांसाठी हा मार्ग महत्वाचा आहे. मात्र, आता या मार्गावरील प्रवास महागणार आहे. या मार्गावरील टोल दरात तब्बल १८ टक्क्यांनी वाढ प्रस्तावित केली असून ही दरवाढ १ एप्रिल पासून लागू होणार आहे. या मार्गावरील टोलदरवाढ ही दर तीन वर्षांनी करण्यात यावी अशी अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार २०२० नंतर आता यंदा या मार्गावरील टोलदरात वाढ करण्यात येत आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा अतिशय पथदर्शी प्रकल्प मानला जातो. या मार्गामुळे मुंबई पुण्याचे अंतर काही तासांमध्ये आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा व्हिजनरी प्रकल्प म्हणूनही ओळखला जातो. सह्याद्री पर्वतांच्या डोंगर रांगांमधून हा मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावर या पूर्वी १ एप्रिल २०२० मध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता १ एप्रिल २०२३ पासून ही नवी दरवाढ लागू करण्यात येणार आहे.
असे असणार नवे दर
वाहन आत्ताचे दर १ एप्रिलपासूनचे दर
चारचाकी २७० ३२०
टेम्पो ४२० ४९५
ट्रक ५८० ६५८
बस ७९७ ९४०
थ्री एक्सेल १३८० १६३०
एम एक्सेल १८३५ २१६५
अती वेगाने अपघात वाढले; वाहतूक कोंडीनेही नागरिक त्रस्त
पुणे मुंबईला जोडणाऱ्या या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. यामुळे तासंतास या मार्गावर प्रवाशांना अडकून पडावे लागते. या सोबतच वेगामुळे या मार्गावरील अपघाताची संख्याही वाढली आहे. अनेक मोठे अपघात गेल्या काही दिवसात या मार्गावर झाले आहेत. अपघात वाढल्याने हा मार्ग वेगाचा की मृत्यूचा अशी टीका देखील होते.