Mumbai Local Train Updates: मीरा रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मार्गावर सकाळी सहा वाजताच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याची नोंद करण्यात आली. एसी लोकलसह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. तसेच अनेक गाड्यांना उशीर होत असल्याच्या घोषणा करण्यात आल्या असून गेल्या ४० मिनिटांत जलद मार्गावर स्टेशनवरून एकही ट्रेन सुटली नाही. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
पश्चिम मार्गावरील गाड्या तब्बल २० ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती समोर आली. पश्चिम रेल्वेने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलद्वारे विलंबाची तक्रार करणाऱ्या प्रवाशांना प्रतिसाद दिला.'भाईंदर स्थानकावर अप स्लो लाईन आणि डाऊन फास्ट लाईनवर पॉइंट क्र. १०४/१०३ येथे सकाळी ६ वाजताच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. तांत्रिक समस्या सकाळी ६.३० वाजता सोडवण्यात आली. मात्र, पर्टिक्युलर सेक्शनवरील गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.' अशी पोस्ट पश्चिम रेल्वेने केली.
झारखंडच्या सरायकेला- खरसावां जिल्ह्यातील बाराबंबो स्थानकाजवळ हावडा-मुंबई मेल रुळावरून घसरली. मालगाडीला धडकून झालेल्या या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून किमान २० जण जखमी झाले आहेत. जखमींना त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली. अपघाताचे कारण समजू शकले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातामुळे झालेल्या अडथळ्यांमुळे अनेक गाड्या उशिराने धावत होत्या. खरगपूर-धनबाद एक्सप्रेस, हावडा-बारबिल एक्सप्रेस, आसनसोल-टाटा एक्सप्रेस, इस्पात एक्सप्रेस, खरगपूर-झारग्राम-धनबाद एक्सप्रेस, हावडा-बारबिल जनशताब्दी एक्सप्रेस आणि शालीमार-एलटीटी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. हावडा-सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेस, हावडा-पुणे एक्स्प्रेस आणि पुरी-ऋषिकेश एक्स्प्रेसचे मार्ग बदलण्यात आले.
या महिन्यात रेल्वे रुळावरून घसरण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान, १८ जुलै रोजी उत्तर प्रदेशातील गोंडा येथे दिब्रुगड एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरून झालेल्या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला होता, तर 20 जण जखमी झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी लखनौहून दिल्लीला जाणारी मालगाडी अमरोहा रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरल्याने दिल्ली-लखनौ रेल्वे मार्ग विस्कळीत झाला होता. सुदैवाने, त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
संबंधित बातम्या