Mumbai Water Supply News: मुंबई महानगरपालिकेच्या तानसा (पश्चिम) जलवाहिनीला आज (२१ जानेवारी २०२५) सकाळी पवई येथील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड पुलाजवळ मोठी गळती लागली. परिणामी, तानसा जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला असून धारावीसह अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होईल. पाइपलाइनवरील दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून ते पूर्ण होण्यासाठी सुमारे २४ तास लागतील, अशी अपेक्षा आहे. या काळात नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली. ‘तानसा पश्चिम जलवाहिनीला पवई येथील जोगेश्वरी- विक्रोळी जोड रस्त्यावरील पुलाजवळ मोठी गळती लागल्याचे आज पहाटे आढळून आले. त्यामुळे तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला. जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्तीकरीता २४ तासांचा कालावधी अपेक्षित आहे. दुरुस्ती कामासाठी पवई ते धारावी दरम्यान जलवाहिनी बंद करण्यात येणार आहे. या कालावधीत एस विभाग, के पूर्व विभाग, जी उत्तर विभाग आणि एच पूर्व विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनी दुरुस्ती काळात नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे’, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
एस विभाग: गौतमनगर निम्न पातळी, जयभीम नगर, बेस्ट नगर, फिल्टर पाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे रस्ता, मिलिंद नगर, एल ऍण्ड टी परिसर.
के पूर्व विभाग: ओम नगर, साहारगाव, जे. बी. नगर, लेलेवाडी, मरोळ जलवाहिनी, कदमवाडी, शिवाजी नगर, सेव्हन हिल्स रूग्णालय परिसर, चिमटपाडा, टाकपाडा, सागबाग, तरुण भारत, चकाला, कबीर नगर, बामणवाडा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसर.
जी उत्तर: धारावी.
एच पूर्व: बेहरामपाडा, वांद्रे रेल्वे टर्मिनस.
संबंधित बातम्या