Mumbai water News: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी मोठ्या प्रमाणात तळ गाठल्याने मुंबईवर पाणी कपातीचे संकट होते. जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. यामुळे मुंबईमहानगर पालिकेने आता पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३० तारखेपासून ही कपात लागू केली जाणार आहे. ३० मे पासून ५ टक्के तर ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू केली जाणार आहे. या सोबत पाणी वापरण्यासंदर्भात मुंबई पालिकेने सूचना देखील जाहीर केली असून त्याचे पालन करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलतेन मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सुमारे ५.६४ टक्के पाणीसाठा कमी आहे. आज मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणात एकूण १ लाख ४० हजार २०२ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत सध्या फक्त ९.६९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा धरणात असून या पाण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणात १,३७,००० दशलक्ष लीटर पाणी मुंबईला देण्यात येणार आहे. तर अप्पर वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला दिला जाणार आहे. त्यामुळे मुंबईसाठी पाणीसाठा असला तरी या पाण्याचा योग्य पणे पाण्याचा वापर करावा लागणार आहे. असे असले तरी बाष्पीभवन आणि पाणीसाठा १० टक्क्यापेक्षाही कमी झाल्यामुळे पाण्याचे नियोजन करावे लागणार असल्याने मुंबई पालिकेने पाणी कपात लागू केली आहे.
त्यानुसार ३० मे पासून ५ टक्के तर १० जून पासून १० टक्के पाणी कपात लागू केली जाणार आहे. समाधानकारक पाऊस होई पर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे.
दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पालिकेने काही सूचना नागरिकांना दिल्या आहे. त्यानुसार घरकामे करताना पाण्याचे नळ सुरू ठेऊ नका. भांड्यांमध्ये पाणी ओतून कामे करा.
वाहने धुण्यासाठी नळी न लावता भांड्यामध्ये पाणी घेवून ओल्या कापडाने वाहने पुसा. घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने आदी धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसा. पाणी शिळे समजून फेकू नका. वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुवा. नळ तसेच वॉश बेसिनचे नळ यांचा प्रवाह मर्यादीत करणाऱ्या किंवा तुषार स्वरुपात पाणी प्रवाहित करणाऱ्या तोट्या योग्य रित्या बंद करा. उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यांमध्ये पाणी द्यावे. अथवा पाण्याची बाटली पुरवावी. जेणेकरुन अकारण पाण्याने भरुन ठेवलेल्या पेल्यांचे पाणी वाया जाणार नाही.
आवश्यक तितकेच पाणी पेल्यामध्ये घेवून प्यावे. आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ केल्याने पाण्याची मोठी बचत होते. नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे. सर्व घरांमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची यंत्रणा, वाहिन्या तपासाव्यात. कोठेही गळती आढल्यास तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी, यातून पाण्याची बचत देखील होते व पाणी दूषित होत नाही. छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओसंडून वाहणार (ओव्हरफ्लो) नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
संबंधित बातम्या