Mumbai Water Supply: मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीपुरवठा झपाट्याने कमी होत आहे. गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे यंदा मुंबईकरांवर पाणीसंकट ओढवले आहे. मुंबईकर गेल्या काही दिवसांपासून ५ टक्के पाणीकपातीचा सामना करत आहेत. यातच मुंबईत आजपासून अतिरिक्त ५ टक्के पाणीकपात लागू करावी लागली. तलावांच्या पातळीत समाधानकारक सुधारणा होईपर्यंत मुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात करण्यात येत आहे, अशी माहिती एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त ७ टक्के पाणीपुरवठा शिल्लक आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई येत्या ११ जून २०२४ रोजी मान्सून दाखल होईल. उष्मा आणि पाण्याच्या समस्यांपासून सुटका होण्यासाठी लोक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असताना तलावाच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे, नागरी अधिकाऱ्यांनी ३० मे २०२४ पासून शहरात ५ टक्के कपात लागू केली. त्यानंतर आजपासून अतिरिक्त ५ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला. मुंबई महानगरपालिकेने अप्पर वैतरणा आणि भातसा तलावांमधून अतिरिक्त साठा काढण्यास सुरुवात केली.
मुंबईला पााणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घसरली आहे. अप्पर वैतरणा आणि भातसा येथून २.२८ लाख दशलक्ष लिटर पाणी वापरू शकतो,ज्यासाठी फेब्रुवारीमध्ये राज्य सरकारकडून मंजुरी घेण्यात आली. मुंबई महानगरपालिका नियमितपणे पाणीपुरवठ्याचा आढावा घेत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही केले आहे.
पाणीकपातीचा परिणाम मुंबईसह, ठाणे, भिवंडी- निजामपूर महानगरपालिका आणि इतर गावांना दिल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही होणार आहे. वर्षभर पाणीपुरवठा राखण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी तलावांमध्ये एकूण १४.४७ लाख दशलक्ष लिटरचा पाणीसाठा असणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कमी पावसामुळे तलावांमध्ये आधीच ५ टक्के पाणीसाठा कमी होता. गेल्या वर्षी एका महिन्यासाठी १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातून दररोज ३ हजार ९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.
संबंधित बातम्या