मुंबईकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील पाणीपुरवठा मंगळवारी काही प्रमाणात बाधित राहणार आहे. मुंबई शहरात उद्या (१९ मार्च) एका दिवसासाठी १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पिसे येथील बांधावरील गेटच्या एका रबरी ब्लाडरमध्ये १६ मार्च रोजी बिघाड झाला होता. ३२ पैकी एक ब्लाडरमध्ये बिघाड झाल्याने पाणी गळती सुरू होती. याची दुरुस्ती करण्यासाठी पाण्याची पातळी ३१ मीटर पर्यंत खाली आणण्यात आली. यासाठी भातसा धरणातून येणारा पुरवठा कमी करून रबरी ब्लाडर दुरूस्तीचे काम सोमवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत युद्धपातळीवर काम करत पूर्ण करण्यात आले. मात्र, बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्याने ती पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार आहे.
ब्लाडर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर भातसा धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आले. मात्र पाणी पातळी खूप खालावल्याने ती पूर्ववत होण्याकरिता कालावधी लागणार आहे. यासाठी मंगळवारी १९ मार्चला एक दिवसासाठी संपूर्ण मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे.
पिसे येथील बंधाऱ्यात भातसा धरणातून सोडलेले पाणी साठवले जाते. त्यानंतर पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करून येवई येथील महासंतुलन जलाशयामार्फत मुंबईकरांना हा पाणीपुरवठा केला जातो.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीपातळी कमी झाल्याने मुंबई महापालिकेने शहरात २४ एप्रिलपर्यंत ५ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातील मान्सून पूर्व कामासाठी ५ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित बातम्या