Mumbai Taxi Auto Fare: मुंबईत आजपासून रिक्षा, टॅक्सी महाग; मीटर पडताच मोजावे लागणार 'इतके' रुपये
Auto Taxi Fare Hike in Mumbai: रिक्षा व टॅक्सीच्या किमान भाडेवाढीस मान्यता देण्यात आल्यामुळं लाखो मुंबईकरांचा प्रवास आजपासून महाग झाला आहे.
Auto Taxi Fare Hike in Mumbai: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी महाग झाला आहे. मुंबईतील रिक्षा व टॅक्सीच्या भाडेवाढीला मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं (MMRTA) मान्यता दिली आहे. या भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे.
इंधनांच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर रिक्षा-टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. तसंच, संपाचा इशाराही दिला होता. त्याची दखल घेऊन भाडेवाढीस मान्यता देण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार, रिक्षाच्या भाड्यात दोन रुपयांनी तर, टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळं आता रिक्षासाठी किमान भाडं २३ रुपये तर टॅक्सीचं किमान भाडं २८ रुपये असेल. एसी टॅक्सी अर्थात, कूल कॅबच्या भाड्यात सात रुपयांची वाढ झाली असून कॅबसाठी आता कमीत कमी ४० रुपये मोजावे लागतील. रिक्षा व टॅक्सी चालकांना ३० नोव्हेंबरपर्यंत मीटरचे कॅलिब्रेशन करून घ्यावं लागणार आहे.
मुंबईत ४८ हजार टॅक्सी आणि दोन लाख ऑटो रिक्षा आहेत. लाखो मुंबईकर रोजच्या रोज रिक्षा टॅक्सीनं प्रवास करतात. त्या सगळ्यांना भाडेवाढीचा फटका बसणार आहे. मुंबई शहरातील नागरिकांना रिक्षाचा पर्याय नसल्यानं त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
शेअरिंगही महागण्याची शक्यता
रिक्षा व टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाल्यामुळं आता शेअर रिक्षा व टॅक्सीचा प्रवासही महागण्याची शक्यता आहे. बेस्ट बस व रेल्वेची सुविधा नसलेल्या भागात शेअर रिक्षा व टॅक्सी हा मुंबईकरांचा आधार आहे. मात्र, आता शेअर रिक्षा, टॅक्सीही महागण्याची शक्यता आहे.