Salman Khan News: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने माफी मागितली आहे. संबंधित व्यक्तीने चुकून धमकीचा मेसेज पाठवल्याचा दावा केला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर १८ ऑक्टोबर रोजी धमकीचा मेसेज पाठवण्यात आला होता, ज्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसोबतचा वाद मिटवण्यासाठी सलमान खानकडून पाच कोटींची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास त्याची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल, अशी धमकी मॅसेजद्वारे देण्यात आली होती.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन झारखंडमधून ट्रॅक करण्यात आले होते. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी जवळचा असल्याचा दावा केला आणि खंडणीची रक्कम न दिल्यास सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 'सलमान खानला जिवंत राहायचे असेल आणि लॉरेन्स बिश्नोईसोबतचे वैर संपवायचे असेल तर त्याला पाच कोटी रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाहीतर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल, अशी धमकी मेसेजद्वारे देण्यात आली.
मुंबई वाहतूक पोलिसांना मिळालेल्या धमकीच्या मेसेजप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी चे नेते बाबा सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी रात्री वांद्रे येथील त्यांचे आमदार पुत्र जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर लगेचच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने हत्येची जबाबदारी स्वीकारली. अभिनेता सलमान खानच्या जवळच्या कोणालाही असेच भवितव्य भोगावे लागेल, असा दावाही मारेकऱ्यांनी केला आहे.
सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी एप्रिल महिन्यात झालेल्या गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला. गुन्हेगारी टोळीचे सदस्यत्व आणि संघटित गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग हे आधीवैयक्तिक आरोप नसतानाही या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसे आधार आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवरून त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत असल्याचे सांगत विक्की गुप्ता या हल्लेखोराचा जामीन ही न्यायालयाने फेटाळून लावला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी गुप्ता आणि अन्य एका दुचाकीस्वारहल्लेखोराने सलमान खानच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत गोळीबार केला. गुप्ता यांना दोन दिवसांनंतर १६ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. तर, सरकारी पक्षाने दावा केला होता की, हा गोळीबार तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या साथीदारांच्या नेतृत्वाखालील गुन्हेगारी टोळीच्या मोठ्या कटाचा भाग होता. आरोपींवर खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणे, शस्त्रास्त्र कायदा आणि मोक्का सह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या