Mumbai Local : हार्बर रेल्वेसेवेचे शुक्लकाष्ट संपेना; बिघाड दुरुस्त होऊनही लोकल धावतीय अर्धा तास उशिरा
Mumbai Local Updates: हार्बर रेल्वे मार्गावर वाशी पनवेल दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे या मार्गावरची लोकलसेवा ही विस्कळीत झाली आहे. लोकल २० ते २५ मिनिटे उशिरा धावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबई : हार्बर लाइन मार्गाने प्रवास करणाऱ्यांची आजची सकाळ या मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने खराब गेली. या मार्गावरील लोकलसेवा ही तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहे. यामुळे त्यांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहचण्यास उशीर होणार आहे. सिग्नल यंत्रणेतील हा बिघाड दुरुस्त झाल्यावरही या मार्गावर लोकलसेवा ही तब्बल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहे.
मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावरची लोकलसेवा जुईनगरजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाशी ते पनवेल दरम्यान ठप्प झाली होती. या बिघाडाची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळताच तातडीने बिघाड झाल्याच्या ठिकाणी रेल्वेचे अभियंत्रे हे बिघाड दुरुस्त करण्याच्या कामाला लागले. काही वेळात हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र, असे असतांनाही या मार्गावरील लोकलसेवा ही अर्ध्या तासाने उशिरा धावत आहे. या मार्गावरची रेल्वे सेवा पूर्वपदावर येण्यासाठी आणखी विलंब लागणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. या बिघाडामुळे एक तास हा मार्ग बंद असल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला. कामावर जाण्यासाठी त्यांना उशीर होणार आहे. या तांत्रिक बिघाडामुले मात्र, हार्बर रेल्वेचे वाहतूक वेळापत्रक कोलमडले आहे.
रेल्वेमार्गात सातत्याने होणाऱ्या बिघाडमुळे लोकल प्रवाशांचा मनस्ताप वाढला आहे. मुंबईची मोठी लोकसंख्या ही या यंत्रणेवर अवलंबून असते. त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी लोकल हाच एक पर्याय आहे. मात्र, सतत होणाऱ्या बिघाडामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या बिघडामुळे सकाळी कार्यालयात जाण्यासाठी चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
संबंधित बातम्या
विभाग